शासनाकडे मागणी : जुन्याच बसेस रस्त्यावर, वाहतुकीवर ताण
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनच्या ताफ्यात बसची संख्या कमी असल्याने प्रवासी वाहतुकीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शासनाने 2,800 नवीन बसेस खरेदी करण्यासाठी 931 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी परिवहनने केली आहे.
मागील दोन वर्षांत बससेवा पूर्णपणे थांबली होती. दरम्यान महसूलही शून्यावर आला होता. त्यामुळे परिवहनला राज्य सरकारवर अवलंबून रहावे लागले होते. दरम्यान, राज्य सरकारने परिवहनला आर्थिक मदत देऊ केली होती. शासनाने 2800 नवीन बस द्याव्यात, त्यापैकी 1500 बसेस केएसआरटीसीसाठी तर 1300 बसेस एनडब्ल्यूकेएसआरटीसीला देणे आवश्यक आहे.
परिवहनकडे बसचा अभाव असल्याने प्रवासी वाहतुकीला अडचणी येत आहेत. दरम्यान 9.3 लाख किलोमिटरचा प्रवास केलेल्या जुन्या बसेस वाहतुकीसाठी वापरल्या जात आहेत. आयुष्यमान संपलेल्या बसेस रस्त्यावर धावत असल्याने अडचणी वाढल्या आहेत. साधारण 15 वर्षे वापरलेल्या बसेस भंगारात काढल्या जातात. मात्र बसेसचा तुटवडा असल्याने अद्यापही बऱयाच जुन्या बसेस रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. या बसमुळेच प्रवाशांच्या जीवालादेखील धोका निर्माण झाला आहे.
परिवहन मंडळाच्या ताफ्यात जुन्या बसेसचा भरणा अधिक असल्याने काही मार्गावर बसफेऱया कमी दिसून येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तर कोरोनापासून अद्यापही काही मार्गावर बससेवा पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे परिवहनच्या ताफ्यात नवीन बस दाखल होणे गरजेचे आहे.