महमूद मदनींचे मुस्लिमांना आवाहन ः समाजातील अन्यायाविरोधात मैदानात उतरा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नवी दिल्लीच्या रामलीला मैदानात जमियत उलेमा-ए-हिंदचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित पार पडले असून यात संघटनेचे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी मुस्लिमांना द्वेषाच्या राजकारणावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रनिष्ठेची शिकवण आमचा धर्म देखील देतो. महिलांना समानतेची वागणूक देण्यासह समाजातील अन्यायाविरोधात उभे ठाकण्याचे आवाहन मदनी यांनी यावेळी मुस्लिमांना केले आहे.
मुस्लिमांमध्ये पसमांदा समुदायाची स्थिती हलाखीची आहे. जातीपातीच्या नावावर झालेले शोषण लज्जास्पद आहे. हे शोषण दूर करायचे असून पसमांदा मुस्लिमांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचे आम्ही स्वागत करतो असे जमियत प्रमुखांनी म्हटले आहे.
फूट पाडणाऱया राजकारणावर बहिष्कार टाकण्याची गरज आहे. देशावर प्रेम हा आमच्या पूर्वजांचा संदेश आहे. गांधींनीही एकतेसाठी लढाई लढली होती. कधी इस्लाम, कधी हिंदुत्वावर नावावर फूट पाडली जात असून हा प्रकार या देशाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे मदनी यांनी नमूद केले आहे. यादरम्यान त्यांनी सरसंघचालकांच्या सर्वांना समान ठरविणाऱया विधानाचे कौतुक केले. संघ-भाजपशी आमचे कुठलेच वैर नाही. आम्ही सर्वांनी मिळून या देशाला महाशक्ती करूया. मैत्रीसाठी पुढे केला जाणारा हात स्वीकारला जावा असे मदनी यांनी सरसंघचालकांना उद्देशून म्हटले आहे.
देशातील मुस्लिमांनी महिलांशी समानतेच्या तत्वासह वागावे. महिलांचा आम्ही छळ करतो, आमच्यामध्ये बदल घडवून आणले नाही तर बदल घडून येणार नाही. समाजातील अन्यायाच्या विरोधात भूमिका घेतली तर पर्सनल लॉमध्ये बदल करण्याची गरज भासणार नसल्याचे मदनी यांनी म्हटले आहे.
अरशद मदनींच्या वक्तव्यावर वाद
जमियत उलेमा-ए-हिंदच्या राष्ट्रीय अधिवेशनात मौलाना अरशद मदनी यांच्या एका वक्तव्यावरून वाद झाला आहे. हिंदूंचा पूर्वज देखील मुस्लीम होता असे अरशद मदनी यांनी म्हटले हेते. यावर अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणि महाराज यांनी प्रत्युत्तर देत अरशद मदनी यांना वंदे मातरम् म्हणण्याचे आव्हान दिले. मदनी यांच्या वक्तव्यानंतर अधिवेशनात उपस्थित अनेक धर्मगुरुंनी नाराजी व्यक्त करत तेथून निघून जाणे पसंत केले होते. अरशद मदनी आणि महमूद मदनी यांच्यातील वादातून हे विधान करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
देशातील मोठी इस्लामिक संघटना
जमियत उलेमा-ए-हिंद ही भारतातील प्रमुख इस्लामिक संघटनांपैकी एक आहे. ही संघटना देवबंदी विचारसरणीने प्रभावित आहे. याची स्थापना 1919 मध्ये झाली होती. देशभरात जमियतचे कोटय़वधी अनुयायी असल्याचे म्हटले जाते.