एडीजीपींचे आवाहन : म. ए. समिती-कन्नड संघटनांची बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. जोवर निकाल येणार नाही, तोवर बेळगावसह सीमाभाग शांत ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असे काम कोणीही करू नये, असे आवाहन अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी केले.
शुक्रवारी टिळकवाडी पोलीस स्थानकात म. ए. समिती व कन्नड संघटनांची संयुक्त बैठक अलोककुमार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. म. ए. समितीने म्हणणे मांडताना सांगितले की, आजवरच्या प्रत्येक अधिवेशनावेळी आम्ही महामेळावा करून आपला निषेध व्यक्त करत आलो आहोत. तसेच आम्ही कोणत्याही भाषा अथवा राज्याच्या विरोधात नसून आमच्या भाषिक अधिकारासाठीचा आमचा लढा असल्याचे सांगण्यात आले.
मागील काही दिवसांत घडलेल्या घटना या सीमाभागात घडलेल्या नसून एखादी कृती कानडी संघटनांनी केली की त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतात. त्यामुळे त्या त्या प्रदेशात कायदा व सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी आहे. मागील 66 वर्षांपासून लोकशाहीमार्गाने सीमालढा सुरू असल्याचे अलोककुमार यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी अलोककुमार म्हणाले, सीमाभागात शांतता राहणे गरजेचे आहे. बसवर दगडफेक, काळे फासणे, आंदोलने करणे अशा कृतींमुळे राज्यांमधील तेढ वाढते. याचा परिणाम सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, उपायुक्त रविंद्र गडादी, एसीपी ए. चंद्राप्पा, पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी, मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, अॅड. एम. जी. पाटील आदी उपस्थित होते.