तुकाराम मुंढे यांनी ‘आरोग्य’ आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून यंत्रणा अलर्ट : अवघ्या काही दिवसांत आरोग्य विभाग वठणीवर : कार्यप्रणालीत सुधारणा केली नसल्यास होणार कारवाई
कृष्णात चौगले/कोल्हापूर
वैद्यकीय अधिकारी दुपारीच गायब होतात, आरोग्य कर्मचारी उपस्थित नसतात, बाळंतपणासाठी रात्री, मध्यरात्री प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱया गर्भवती मातांना शहरातील शासकीय रुग्णालयाचा रस्ता दाखवणे, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांतील कुरघोडीचे राजकारण आदी अनेक कारणांमुळे आरोग्य विभाग दिवसेंदिवस बदनाम होत चालला आहे. कामकाजात सुधारणा करण्याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सूचना देऊनही त्यामध्ये सुधारणा झालेली नाही. पण ज्या दिवशी आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आयुक्त पदाचा तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्विकारला, तेंव्हापासून राज्यासह जिल्ह्या3तील आरोग्य विभाग अलर्ट झाला असून कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत.
राज्यातील शासकीय आरोग्य सेवा म्हणजे सर्वसामान्यांचा आधारवड. पण कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे गेल्या काही वर्षात नागरिकांतून आरोग्य विभागाबद्दलच्या तक्रारीत वाढ झाली आहे. बहुतांशी आरोग्य कर्मचारी तर कामापेक्षा कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त असल्यामुळे त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याबद्दलची अनेक निवेदने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे मोठय़ा प्रमाणात सादर होत असतात. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत, अशा बहुतांशी ठिकाणी एक वैद्यकीय अधिकारी तीन दिवस आणि दुसरा वैद्यकीय अधिकारी तीन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करताना दिसतात. दुर्गम भागातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी तर आले कधी, आणि गेले कधी ? हा स्थानिक नागरीकांना पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे शासन आरोग्य सेवेवर कोटय़वधी रूपये खर्च करत असून देखील तळागाळातील सर्वसामान्य जनतेला योग्य आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे त्यांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.
हे ही वाचा : बेनिक्रेतील अपंग तरुणाची सैन्यभरतीत भरारी
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 13 प्रकारच्या आरोग्य सेवा रुग्णांना दिल्या जातात. या सेवा नांगरिकांना मिळण्यासाठी जिल्हयातील प्रत्येक उपकेंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली आहे. कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱयांबरोबरच सीएचओ कार्यरत असतानाही आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत नसल्याबद्दल तक्रारी कायम आहेत.
मुक्काम पोस्ट मुख्यालय
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी रहावे, आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणा न करता रुग्णसेवा द्यावी आदी सुविचारवजा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी यापूर्वी वेळोवेळी दिल्या आहेत. पण ‘मागील बाकी, पुढील पानावर’ या प्रचलित म्हणीप्रमाणे वादग्रस्त आणि कामचुकार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनामध्ये फारसा फरक पडला नव्हता. पण तुकाराम मुंढे यांच्या एन्ट्रीनंतर आरोग्यच्या कारभारात ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. जे वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नव्हते, ते आता मुख्यालयी राहू लागले असून कामचुकार कर्मचारी कामाला लागले आहेत.
कार्यालयीन शिस्तपालनाबाबत आचारसंहिता
तुकाराम मुंढे यांनी आरोग्यच्या आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी सर्व जिल्ह्यातील जि.प.चे आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांची बैठक घेऊन आरोग्य सेवा सुधारण्याबाबतच सूचना दिल्या आहेत. त्यांनी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱयांनी कशा पद्धतीने कामकाज करावे, कार्यालयीन शिस्तपालन याबाबत आचारसंहिता निश्चित केली आहे. लोकाभिमुख सेवा हवी, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, प्रामाणिकपणे काम करावे, एकवेळ काम करताना चूक झाल्यास माफ केले जाईल, पण कामचुकारांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुंढे यांनी दिला आहे.
जिह्यातील वैद्यकीय अधिकाऱयांना मार्गदर्शन
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘आरोग्य’च्या कार्यपद्धतीबाबत आचारसंहिता लागू केली आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करावे याबाबत सीईओ संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी बुधवारी जि.प.मध्ये बैठक घेऊन मार्गदर्शन केले.