प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात बारावी परीक्षेला शुक्रवार दि. 22 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. परीक्षा सुरळीत होण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण खात्याने तयारी पूर्ण केली आहे. 18 मे पर्यंत चालणाऱया या परीक्षेसाठी 7 लाख 84 हजार 255 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी राज्यभरात 1,076 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. परीक्षेला 6,00519 नियमित विद्यार्थी तर 61,808 रिपिटर्स विद्यार्थी बसणार आहेत. याशिवाय 21,928 बहिस्थ विद्यार्थ्यांनीही परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
कॉपीसारख्या अवैध प्रकारांना चाप लावण्यासाठी परीक्षा केंद्रांपासून 200 मीटर पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यभरात 2152 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच तालुका पातळीवर 858 आणि जिल्हा पातळीवर 74 भरारी पथके असतील.
परीक्षेवेळी हिजाबला परवानगी नाही. त्यामुळे हिजाब किंवा धार्मिक संकेत असणारे कपडे परिधान करून येणाऱया विद्यार्थ्यांना परीक्षा खोलीत बसू दिले जाणार नाही. दरम्यान, हिजाब घालून वर्गात बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करून उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या उडुपीतील 6 विद्यार्थिनी परीक्षेला हजर होतात का?, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. हिजाबवरून वाद निर्माण झालयानंतर या विद्यार्थिनी एकही दिवस वर्गात हजर झाल्या नव्हत्या.