आष्टा/वार्ताहर
वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील वारणा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेने तांदुळवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत घटनास्थळावरून व कुरळप पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,अमोल प्रकाश सुतार (वय -१६) राहणार तांदुळवाडी ता.वाळवा आणि रविराज उत्तम सुतार(वय- १२) राहणार सदाशिवगड राजमाची या.कराड,जि.सातारा अशी या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास अमोल प्रकाश सुतार हा सुट्टीनिमित्त आलेला मावसभाऊ याला घेऊन वैरण काढायला नदीला जाऊया असे सांगून ते वारणा नदी काठाला गेले.वैरण काढून झाल्यावर ते दोघेजण नदी पात्रात उतरले.दोघांनाही पोहायला येत नव्हते.पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.शुक्रवारी सायंकाळपर्यंत मुले घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली.मात्र मुले सापडली नाहीत.नदीपात्राशेजारी मुलांची कपडे आणि चप्पल सापडली.याची माहिती कुरळप पोलीसांना देण्यात आली.
या घटनेची माहिती समजताच कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक जाधव,पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील,काॅन्स्टेबल शंतनू ढवळीकर,सचिन मोरे,हवलदार राजेंद्र यादव यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी धाव घेतली.लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्सचे विनायक लांडगे,सुनिल जाधव यांच्या टिमला पाचारण करून या टिमने दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले.
मयत रविराज सुतार हा सदाशिवगड राजमाची येथील असुन तो सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे आला होता. तो ५ वी च्या वर्गात शिकत होता.त्याचे आई घरकाम करते तर वडील सदाशिवगड ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत.आई-वडील पोटाला चिमटा देऊन रविराज याचा सांभाळ करताना त्याला चांगले शिक्षणही देत होते.मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सदाशिवगड राजमाची परिसरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
अमोल प्रकाश सुतार हा आई-वडीलांना एकूलता एक मुलगा होता.त्याने नुकतीच १० वीची परीक्षा दिली होती.प्रकाश सुतार यांचीही परिस्थिती बेताचीच असुन हाता तोंडाला आलेला मुलाचा मृत्यू झाल्याने घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.सख्या मावस भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या तांदुळवाडी आणि सदाशिवगड राजमाची गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली असुन अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कुरळप पोलीस करीत आहे.
Previous Articleसावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे वंदेभारत एक्सप्रेसला थांबा मिळावा !
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.