ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींचे निकाल समोर येत आहेत. काही ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. निकालानंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष सुरू असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील टाकळी येथे निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपापसात भिडले. त्यावेळी झालेल्या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. धनराज माळी (वय 25) असे मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या जामनेर तालुक्यातील टाकळी येथे निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर दोन गटात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वाद विकोपाला गेल्याने हे गट आपापसात भिडले. यावेळी दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले. धनराज माळी हा गंभीर जखमी होता. त्याला तत्काळ सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगावात खळबळ माजली आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्रात गारठा आणखी वाढणार