शिमोगा, मंगळूरमध्ये कारवाई ः दहशतवादी संघटनांशी संपर्क असल्याचा आरोप
प्रतिनिधी/ बेंगळूर
इस्लामिक स्टेट्स (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी शिमोगा आणि मंगळूर येथे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राज्यात खळबळ माजली आहे. आतापर्यंत बेंगळूरमध्ये अनेक संशयितांना या प्रकरणात अटक झाली आहे. आता मंगळूर व शिमोग्यातही दहशतवादी कनेक्शन असल्याचे प्रकार उघड होत असल्याने सुरक्षा यंत्रणेला धक्काच बसला आहे.
शिमोग्याच्या सिद्धेश्वरनगर येथून सय्यद यासीन उर्फ बैल (वय 21) आणि मंगळूर येथून माज मुनीर अहमद (वय 22) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणातील एक संशयित फरार आहे. एकूण तिघांविरुद्ध शिमोगा ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याप्रकरणी सय्यद यासीन याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. शिमोग्यातील एका प्रतिष्ठित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत आहे. त्याच्या संपर्कात असणाऱया मंगळूरमधील माज मुनीर यालाही ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तो इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. शिमोग्याच्या तीर्थहळ्ळी तालुक्यातील सोप्पुगड्डे येथील आणखी एक संशयित शारिक हा फरार असून त्याचा शोध जारी आहे.
15 ऑगस्ट रोजी शिमोग्यात सावरकर-टिपू सुलतान फ्लेक्सवरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी तणाव निर्माण झाल्याने शहरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. त्यावेळी दुकान बंद करून घरी परतत असलेल्या प्रेमसिंग यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी डीवायएसपी जितेंद्र यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या पथकाने जबीउल्ला याला अटक करून चौकशी केली असता त्याचा सय्यद यासीन, माज मुनीर आणि शारिक यांच्याशी असणारा परिचय उघडकीस आला होता. तसेच जबीउल्लाच्या मोबाईलमधील डाटा तपासल्यानंतर त्याचे दहशतवादी कनेक्शन असल्याचे उघडकीस आले होते. सध्या अटकेत असलेल्या आरोपींची चौकशी करण्यासाठी शिमोग्याचे डीवायएसपी बालराज यांच्या नेतृत्त्वाखालील तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
संशयिताच्या वडिलांनी आरोप फेटाळले
संशयित दहशतवादी यासीन याच्या अटकेसंबंधी त्याचे वडील अयुब खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपला मुलगा देशविरोधी कृत्य करीत नाही. आपल्या मुलाला अटक करून 15 दिवस उलटले आहेत. आपला मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसांकडे दिली होती. मात्र, तक्रार दाखल करून न घेता थातूरमातुर कारणे सांगितली. सोमवारी आपल्याला पोलिसांनी फोन करून मुलाला अटक केल्याची माहिती दिली. पोलीस स्थानकात मुलाला पाहण्याची मुभाही देण्यात आलेली नाही, असे पत्रकारांशी बोलताना अयुब खान यांनी सांगितले आहे.
…छडा लावण्यात येईल!
तीर्थहळ्ळी येथे आणखी काही संशयित
आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. शिमोग्यातून एकाला तर आणखी एकाला किनारपट्टीवरील एका जिल्हय़ातून अटक करण्यात आली आहे. शिमोग्याच्या तीर्थहळ्ळी येथे आणखी काही संशयित असल्याची बाब भीतीदायक आहे. यामागे कोणाचा वरदहस्त आहे, याचा छडा लावण्यात येईल. एक आरोपी यापूर्वीपासूनच दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.
– अरग ज्ञानेंद्र, गृहमंत्री