ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. अरबाज मीर आणि शाहिद शेख अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.
लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने बडगाम जिल्हा न्यायालयाजवळ नाकाबंदी केली होती. यावेळी एक संशयास्पद वाहन जवानांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाहनात बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. या दहशतवाद्यांच्या ताब्यात अलेली शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांचा धनगरी आणि राजौरी येथे झालेल्या हिंदू हत्याकांडाशी संबंध असल्याचे काश्मीर पोलिसांनी म्हटले आहे.