ऑनलाईन टीम/तरुण भारत
स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, असा गंभीर आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केला होता. त्यांच्या या वाक्यावरून वाद सुरू आहे. तसंच, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राहुल गांधी यांची गळाभेट घेतल्याने शिवसेनेवर (Shivsena) टीका केली जात आहे . यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (swatantryaveer savarkar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. आमच्या मनात सावरकर यांच्याविषयी आदरच आहे,” असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते.
सावरकरांविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसंच, स्वातंत्र्यवीरांनी जे स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्याग केला होता, तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरता आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आज स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी बाजूलाच असलेल्या जुन्या महापौर निवास येथे एका व्यंगचित्र प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. याबाबत विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मी अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगतोय की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आमच्या मनात अतीव प्रेम, नितांत आदर आणि श्रद्धा आहेच. कोणी कितीही म्हटलं तरी पुसता येणार नाही. ज्यांचा स्वातंत्र्यालढ्याशी सूतराम संबंध नाही अशा मातृसंस्थेच्या मुलांनी, पिल्लांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे.
तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यावेळी होता, पण स्वातंत्र्यलढ्यापासून ते चार हात लांब होते, त्यांना स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्याचा हक्क नाही, त्यांनी त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करु नये. ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला ते स्वातंत्र्या धोक्यात आल्यानंतर ते अबाधित राखण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. पहिल्यांदा आपल्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय हे सांगावं मग आम्हाला प्रश्न विचारावे. दुसरी गोष्ट भारतरत्न देण्याच अधिकार हा पूर्णपणे पंतप्रधानांचा आहे. आठ वर्षांत स्वातंत्र्यवीरांना तु्म्ही भारतरत्न का दिला नाही? आधी स्वातंत्र्यवीरांसारखं वागायला शिका. पाकिस्तान घ्यायचा हा भाग वेगळा, परंतु पाकव्याप्त काश्मीरमधली एक इंच जमीन सुद्धा आणलेली नाही. तुम्ही आम्हाला स्वातंत्र्यवीरांबद्दल प्रश्न विचारण्याचं धाडस करु नये.”