ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा, असं स्वप्न शिवसेनासंस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पाहिलं होतं. त्यानुसार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ अडीच वर्षांचाच राहिला. त्यातही कोरोनाचा संसर्ग त्यांच्याच कार्यकाळात आल्याने सत्ता टिकवण्यासाठी त्यांना अफाट मेहनत घ्यावी लागली. परंतु, आता येत्या निवडणुकीत सत्तेत आल्यास शिवसेनेतून महिला नेता मुख्यमंत्री होण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
शिवशक्ती-भीम शक्ती-लहू शक्ती जर एकत्र आली तर देशात एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. गद्दार मूठभर सुद्धा नाहीत आणि निष्ठावान डोंगराएवढे आहेत, हे सध्या मी अनुभवतो आहोत. सध्या मी घराबाहेर पडतो आहे तरी यांच्या पोटात गोळा यायला लागलाय. आता आपल्याला मशाल अशी मस्त निशाणी मिळाली आहे. आपल्याला महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं.
आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. मातंग समाज हा दुर्लक्षित राहिलाय हे सत्य आहे. अण्णा भाऊ साठे यांनी मुंबई मिळवून दिली पण मुंबईमध्ये त्यांचं एक स्मारक नाही आणि त्यांना अजूनही भारतरत्न दिला नाही, अशी खंत व्यक्त करतानाच लवकरच मला एक मेळावा घ्यायचा आहे ज्यात लहूशक्ती-भीमशक्ती आणि शिवशक्तीचं शक्तीप्रदर्शन दिसून येईल त्याद्वारे आपल्या न्याय हक्कांसाठी आपल्या अधिकारांसाठी संघटित होण्याची ताकद मिळेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
गद्दार मूठभर सुद्धा नाहीत. पण निष्ठावान डोंगराएवढे आहेत. हे सध्या मी अनुभवतो आहे. मी घराबाहेर पडतो आहे तरी त्यांच्या पोटात गोळा यायला लागलाय. आता आपल्याला मशाल अशी मस्त निशाणी मिळाली आहे. आपल्याला महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊया. आता आपल्याला राज्यात सत्ता आणायची आहे आणि एक महिला मुख्यमंत्रिपदी बसवायची आहे, असं ठाकरे म्हणाले.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी महिलेला मुख्यमंत्रिपदावर बसविण्याचा निर्धार केल्यानंतर शिवसेनेतील कोणती महिला मुख्यमंत्रिपदी बसणार? याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण आतापर्यंत शिवसेनेकडून महिला नेत्याला मंत्रिपदाच्या संधीसाठीही झगडावं लागलं. त्यात उध्धव ठाकरेंनी महिलेला मुख्यमंत्रिपदी बसविण्याची आकांक्षा बोलून दाखवल्याने ठाकरेंच्या मनातली ‘ती’ महिला मुख्यमंत्री कोण? या चर्चांना सुरुवात झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील अनेक रणरागिनी पुढे आल्या आहेत. मुंबई महापालिकेत किशोरी पेडणेकर यांनी आपला दबदबा निर्माण केलाय. त्यामुळे शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून त्या नेहमीच आघाडीवर असतात. त्यातच, सुषमा अंधारे यांच्यानिमित्ताने शिवसेनेला एक नवा चेहरा मिळाला आहे. निलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, प्रियंका चर्तुवेदी आदी महिला नेत्या नेहमीच आघाडीने शिवसेनेची बाजू मांडतात. त्यामुळे यापैकी कोणाकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा उद्धव ठाकरे देतील हे येत्या काळात समजेल.