इमारत मालकांकडून नियम धाब्यावर : अधिकाऱयांकडून जबाबदारी झटकण्याचे काम
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहरात मोठय़ा प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. काही बांधकामांना परवानगीच घेतलेली नाही. काही बांधकामे नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत. याकडे नगरपंचायत तसेच स्थायी समितीचे साफ दुर्लक्ष झाले असून पंचायतीला कोणी वालीच नसल्याचे स्पष्ट होत आहे. जबाबदारी झटकण्याचे काम नगरपंचायतीकडून होत आहे.
सरकारकडून निर्माण टूच्या माध्यमातून बांधकाम करण्यासाठी परवाना देण्यात येतो. निर्माण टूच्या नियमांची अंमलबजाणी होताना दिसत नाही. काही बांधकामे परवानगी नसताना राजरोसपणे सुरू आहेत. काही बांधकामे परवानगी घेऊन मात्र नियम व अटी धाब्यावर बसवून होत आहेत. शहरातील एका विनापरवाना बांधकामाचे कॉलम गटारीत उभारण्यात आले आहेत. या बांधकामाचे सज्जे पूर्णपणे रस्त्यावर आले आहेत. ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणी रस्ता अतिशय अरुंद आहे. मात्र, बांधकाम ठेकेदाराने कोणताच विचार न करता कॉलम गटारीत उभारल्याने रस्ता अरुंद झाला आहे. या बांधकामाबाबत शहरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बांधकाम पूर्णत्वास येईपर्यंत डोळेझाक का?
या बांधकामाच्या परवानगीबाबत नगरपंचायत मुख्याधिकाऱयांना विचारले असता, आम्ही ठोस कारवाईसाठी मूळ मालकालाच नोटीस बजावली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, बांधकाम पूर्णत्वास येईपर्यंत नगरपंचायतीने का डोळेझाक केली, असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
शहरातील अनेक बांधकामे नियमाबाहय़ सुरू आहेत. याबाबत स्थायी समिती अथवा नगरपंचायत प्रशासन का दुर्लक्ष करत आहे, याचे कोडे उलगडत नाही. सामान्य माणसाला बांधकाम परवानगीवेळी निर्माण टूच्या माध्यमातून अनेक कागदपत्रे, पुरावे सादर करावे लागतात. त्यानंतर भरमसाट परवानगी फी आकारली जाते. इतके होऊनही परवानगी वेळेत मिळत नसल्याने नगरपंचायतीला हेलपाटे मारावे लागतात. याबाबतच्या अनुभवांमुळे अनेकजण त्रासले गेले आहेत. मात्र, शहरातील नियमबाहय़ बांधकामे राजरोसपणे सुरू असताना दुर्लक्ष का करण्यात येते, याबाबत अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.
नगरपंचायत मुख्याधिकारी हतबल
अनेक ठिकाणी पत्र्याची शेड उभारून दुकाने उभी राहत आहेत. याबबतची परवानगीही घेण्यात आलेली नाही. कोणत्याही वीज जोडणीसाठी नगरपंचायतीचे नाहरकत पत्र लागते. मात्र, या पत्र्याच्या शेडला परवानगी नसताना तसेच नाहरकतपत्र दिले नसताना वीजजोडणी कोणत्या आधारे करण्यात आली आहे? असाही प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. याबाबत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱयांना विचारले असता ते म्हणाले, काही बाबतीत हेस्कॉम आमच्याकडून विनाहरकत पत्र नसताना थेट वीज जोडणी करते. याबाबत आम्ही काही करू शकत नाही. अशा अनेक प्रकारच्या घटना शहरात सुरू आहेत. मात्र, नगरपंचायतीने साफ दुर्लक्ष केल्याने शहराला कुणी वाली आहे का नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील संपूर्ण रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे नवीन बांधकामे होताना किमान पाच ते आठ फूट सोडून बांधकाम होणे गरजेचे आहे. मात्र शहरात हे होताना दिसत नाही. यासाठी नगरपंचायतीने जबाबदारीने व नियमाबाहय़ बांधकामांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे.