समितीच्या सात शिलेदारांनी समितीचा झेंडा फडकविण्यासाठी तालुक्यात जागृती करणे आवश्यक
खानापूर : खानापूर तालुका म. ए. समितीत एकी झाल्यानंतर येणारी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी 51 हजार रुपयांची देणगी देऊन अर्ज करावेत, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत समितीच्या सात शिलेदारांनी समितीकडे इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज केले आहेत. या सात जणांचे अर्ज समितीकडे येणे हेच समिती जिवंत व जागृत असल्याचे लक्षण आहे. तालुक्यात राष्ट्रीय पक्षांनी समितीचे खच्चीकरण करण्यासाठी गेल्या पाच वर्षांत विविध माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. समितीबाबत मराठी मतदारांत गैरसमज पसरविण्याचा हेतू ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न राजकीय पक्षाचा होता.
गेल्या निवडणुकीत समितीत दुफळी निर्माण झाली होती. त्याचा फायदा राष्ट्रीय पक्षांनी घेत तरुण कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आकर्षिक करून घेण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने, पदांची आमिषे दाखवून समिती कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच वातावरण निर्मितीही करण्यात राष्ट्रीय पक्ष यशस्वी झाले होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपूर्वी समितीत एकी झाल्यानंतर कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून समितीने पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबरोबर निवडणूक लढविण्याच्या प्रक्रियेने सुऊवात केली. आणि अर्ज मागविण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यात मुरलीधर पाटील जळगा, आबासाहेब दळवी मणतुर्गा, निरंजन सरदेसाई खानापूर, गोपाळ पाटील गर्लगुंजी, पांडुरंग सावंत गर्लगुंजी, विलास बेळगावकर कुसमळी, रुक्माण्णा झुंजवाडकर खैरवाड यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे समितीतील इच्छुकांच्या आकड्यामुळे निवडणुकीत निश्चित रंग भरणार आहे.
मागील निवडणुकीत दुहीमुळे समितीचा पराभव झाला. ही सल सर्वांना सतावत होती. आपल्या दुहीचा फायदा राष्ट्रीय पक्षांनी घेतल्याने समितीचा बाल्लेकिल्ला असलेला खानापूर तालुका ढासळला. त्यामुळे सीमाप्रश्नाच्या चळवळीचे मोठे नुकसान झाले. मात्र दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी सीमाप्रश्नाची लढाई गेल्या पाचवर्षांत वेगवेगळ्या मार्गाने सुरूच ठेवली. याचवेळी समितीच्या माध्यमातून आमदार म्हणून निवडून आलेल्या नेत्याने आपल्या राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला. यामुळे तालुक्यात मराठी भाषिकांत तीव्र भावना निर्माण झाली होती. एकी व्हावी यासाठी मध्यवर्तीकडे प्रयत्न सुरू केले. त्याला यश आले असून नुकताच दोन्ही गटाच्या एकीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांत व सर्वसामान्य जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ढासळलेला गड पुन्हा हस्तगत करण्यासाठी सात जणांच्या शिलेदारांच्या एकीच्या माध्यमातून ही लढाई उत्स्फूर्तपणे लढली पाहिजे.
मराठ्यांचा लढाईचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा
यासाठी वेडात वीर दौडले सात या उक्तीप्रमाणे या सात जणांनी पुढील दोन महिने तालुक्यात समितीच्या जागृतीसाठी अहोरात्र काम केले पाहिजे. सर्वांनी मराठ्यांचा लढाईचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहिले पाहिजे. मराठीच्या तसेच समितीच्या खच्चीकरणासाठी राष्ट्रीय पक्षांकडून साम-दाम-दंड-भेद या सगळ्या युक्त्या वापरल्या जाण्याची शक्यता आहे. यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व सात शिलेदारांनी मराठी भाषिकांच्या प्रत्येक घरापर्यंत जावून समितीचा इतिहास सांगितला पाहिजे. तसेच नव युवकांना समितीच्या त्यागाबद्दल तसेच हुतात्म्याबाबत या ऐतिहासिक लढ्याचा इतिहास माहिती नसल्याने तरुण राष्ट्रीय पक्षाकडे ओढला गेला आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून समाज माध्यमाद्वारे युवकांना समितीच्या लढ्याची माहिती पोहोचविणे गरजेचे आहे. खानापूर तालुका हा सीमा लढ्यातील अग्रगण्य तालुका असून आजपर्यंत सीमालढ्यात तालुक्याचे योगदान फार मोठे आहे. सीमा लढ्यातील पहिल्या सत्याग्रहाच्या वेळी तालुक्यातून गावागावातून युवकांनी या लढ्यात सहभागी होऊन कारावास, लाठीमार, गोळीबार झेलला आहे. अनेकांचे संसार या लढ्यात उदध्वस्त झाले आहेत. सर्वसामान्य मराठी भाषिकांच्या बळावर हा लढा गेल्या 66 वर्षांपासून आजही त्याच तीव्रतेने सुरू आहे. सीमाप्रश्न अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या निवडणुकीत समितीचा उमेदवार जिंकणे ही काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने ही निवडणूक लढविणे गरजेचे आहे.