खबरदारी म्हणून जनावरांना लस : पशुपालकांचे सहकार्य आवश्यक
बेळगाव : पशुसंगोपन खात्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यात लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व जनावरांना लस देण्यात येत आहे. पशुपालकांनी आपल्या गाय, म्हैस आणि बैल या जनावरांना लस टोचून घ्यावी, असे आवाहन खात्याने केले आहे. जिल्ह्यात 28 लाखाहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव, शेळ्या, मेंढ्या, कुत्रा, मांजर, ससे आदींचा समावेश आहे. त्यापैकी गाय, म्हैस, बैलांना ही लस दिली जात आहे. सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला होता. तब्बल 25 हजारहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला होता. आता काही प्रमाणात प्रादुर्भाव आटोक्यात आहे. दरम्यान खबरदारी म्हणून सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
विशेषत: लम्पीमुळे गो-वर्गीय जनावरांना अधिक प्रमाणात लागण होऊ लागली आहे. त्यामुळे गो-वर्गीय जनावरांना प्रथमत: प्रतिबंधक लस दिली जात आहे. सप्टेंबर दरम्यान बेळगाव तालुक्यात प्रथम या रोगांची लागण झाली होती. त्यानंतर जिल्ह्dयात प्रादुर्भाव वाढला होता. दरम्यान खात्याने रॅपेड अॅक्शन पथकाची नियुक्ती करून रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रोगाची तीव्रता अधिक असल्यामुळे तब्बल 25 हजारहून अधिक जनावरांचा बळी गेला होता. पावसाळ्याच्या तोंडावर ओल्या चाऱ्यांतून विविध आजारांची लागण होते. खबरदारी म्हणून खात्याने लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक तीव्रपणे राबविली आहे. पशुपालकांच्या घरोघरी जाऊन बैल, गाय व वासरांना ही लस दिली जात आहे. जिल्ह्यात गाय आणि बैलांची संख्या अधिक आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने बैल जोडींची कामे वाढली आहेत अशा परिस्थितीत पशुधन निरोगी राहणे आवश्यक आहे. यासाठी खात्याने प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली आहे.
लसीकरणास पशुपालकांनी सहकार्य करावे
जिल्ह्यात लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घेऊन सहकार्य करावे, खबरदारी म्हणून ही मोहीम सर्वत्र राबविली जात आहे. पशुधनाला रोगांपासून दूर ठेवण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– डॉ. राजीव कुलेर (सह संचालक पशुसंगोपन खाते)