विविध स्पर्धांचा समावेश, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव होणार
प्रतिनिधी /सांगे
गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळ-गोवा यांच्या सांगे शाखेतर्फे 17 वा अखिल गोवा धनगर महोत्सव कला आणि संस्कृती खाते तसेच माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या संयुक्त विद्यमाने रविवार 22 रोजी सकाळी 11 पासून वालकिणी वसाहत क्र. 1 मध्ये आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सांगे धनगर समाजाचे अध्यक्ष सदा डोईफोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली .
यावेळी त्यांच्यासोबत खजिनदार रवी वरक, भैरो झोरे, सुदेश यमकर, जानू ताटे उपस्थित होते. पुढे बोलताना डोईफोडे म्हणाले की, महोत्सवाचे उद्घाटन अखिल गोवा धनगर समाजाचे अध्यक्ष बाबू कवळेकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, माजी आमदार वासुदेव गावकर, नरेंद्र सावईकर, जिल्हा पंचायत सदस्या सुवर्णा तेंडुलकर, उगे सरपंच भारती नाईक, नेत्रावळी सरपंच बुंदो वरक, उपसरपंच रामा पांढरमिसाळ व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संध्याकाळी बक्षिसवितरण समारंभाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सावर्डेचे आमदार गणेश गावकर, भाटीचे सरपंच चंद्रकांत गावकर व इतर मान्यवर उपस्थित राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या महोत्सवात धनगर वेशभूषा स्पर्धा 14 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सकाळी 11 ते दुपारी 1.30 पर्यंत होणार असून विजेत्यांना ऊ. 3000, रु. 2000 व रु. 1000 अशी बक्षिसे देण्यात येतील.
धनगर फुगडी स्पर्धा ही धनगर समाज मर्यादित स्पर्धा संध्याकाळी 2 ते 3 दरम्यान घेण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी धनगराच्या वेषात येणे आवश्यक असून विजेत्यांना रोख 6000, 4000, 3000 अशी बक्षिसे देण्यात येतील. तर धनगर गजानृत्य स्पर्धा संध्याकाळी 3 ते 5 दरम्यान घेण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पथकात दहा ते बारा जणांचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय स्पर्धक धनगरांच्या वेषात असणे गरजेचे आहे. विजेत्यांना ऊ. 8000, 6000 व 4000 अशी बक्षिसे देण्यात येतील. बासरीवादन स्पर्धा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असून विजेत्यांना रोख 1500, 1000 व 500 अशी बक्षिसे देण्यात येतील.
स्पर्धा झाल्यानंतर संध्याकाळी 5.30 वा. बक्षिसवितरण कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते धनगर समाजातील 2021-22 मधील दहावी परीक्षेतील प्रथम दहा विद्यार्थ्यांचा तसेच बारावी व पदवी परीक्षांतील प्रत्येक शाखेतील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा आणि क्रीडाक्षेत्रात राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात येईल, अशी माहिती रवी वरक यांनी दिली.