अग्निपथ योजनेवरून सरकारवर टीकास्त्र
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अग्निवीरांना पेन्शनचा (निवृत्ती वेतन) हक्क नसेल तर लोकप्रतिनिधींना ही सुविधा कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करत भाजप खासदार वरुण गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. यापूर्वीही सरकारच्या अनेक योजनांवर त्यांनी वेळोवेळी आगपाखड व्यक्त केली आहे. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून कठोर भूमिका घेतली आहे.
देशाचे रक्षण करणाऱया अग्निवीरांना पेन्शनचा अधिकार नसेल तर मी स्वतःची पेन्शन सोडायलाही तयार आहे, अशी घोषणा वरुण गांधी यांनी शुक्रवारी केली. देशातील आमदार-खासदार आपली पेन्शन सोडून अग्निवीरांना पेन्शन देण्याची तजवीज करू शकत नाही का? अल्पकाळ सेवा केलेल्या अग्निवीरांना पेन्शन मिळत नाही, मग लोकप्रतिनिधींना आयुष्यभरासाठी ही सुविधा कशी काय मिळते? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.