दरवर्षी 30 गाड्या भंगारात जाणार
पणजी : पंधरा वर्षांची जुनी वाहने भंगारात काढण्याच्या सरकारच्या धोरणामुळे कदंब वाहतूक महामंडळासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून प्रतिवर्षी 30 बसगाड्या मोडीत काढाव्या लागणार असल्याने त्याची भरपाई कशी करणार? असा प्रश्न उभा राहिला आहे. कदंब महामंडळाच्या ताफ्यातील बसगाड्या कमी होणार असल्यामुळे त्यांची संख्या आणि नियमित मार्ग यांची सांगड कशी घालणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. कदंब महामंडळ आधीच तोट्यात असून अनेक बसगाड्या 15 वर्षांच्या आसपास जुन्या झाल्या आहेत. भंगार धोरणानुसार त्या मोडीत काढल्यास त्यांच्या बदली गाड्यांची भरपाई होणे कठीण आहे. त्यामुळे हे धोरण महामंडळास मारक ठरणार अशी चिन्हे दिसत आहेत. कदंब बसगाड्यांची सध्याची परिस्थिती बिकट असून त्या वाटेत कधी बंद पडतील ते सांगता येत नाही. अलिकडे त्या गाड्या ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. कदंबच्या ताफ्यात 650 बसगाड्या आहेत. त्यातील 150 इलेक्ट्रॉनिक बसगाड्या आहेत तर उर्वरित 500 बसगाड्या डिझेलवर चालतात. भंगार धोरणाची कार्यवाही म्हणून कदंब महामंडळाने सुमारे 35 बसगाड्या मार्गावऊन कमी केल्या आहेत. सरकारतर्फे 100 नवीन इलेक्ट्रॉनिक बसगाड्या लवकरच कदंब महामंडळास देण्यात येणार आहेत. त्या कधी मिळतील याची शाश्वती नाही. भंगार धोरणामुळे कदंब महामंडळाच्या बसगाड्यांची गळती प्रतिवर्षी वाढणार असली तरी ती ई-गाड्यांनी भऊन येण्यासारखी नाही.