एससी-एसटी आयोग अध्यक्षाची माहिती : मडगावात झाला प्रेरणा दिन
प्रतिनिधी / मडगाव
उटाच्या बाळळी येथील आंदोलनात बळी गेलेल्या मंगेश गांवकर व दिलीप वेळीप या दोघां युवकांना अद्याप न्याय मिळालेला नाही याची खंत आपल्याला आहे. न्यायालयाने दिलेला निवाडा विरोधात गेल्याने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी असल्याची माहिती एससी-एसटी गोवा आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर यांनी काल गुरूवारी मडगावात प्रेरणा दिनात बोलताना दिली. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी सरकार व ‘उटा’ने सहकार्य करावे असे ही ते म्हणाले. आदिवासी कल्याण खाते व युनायटेड ट्रायबल असोसिएशन (उटा) यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजातील मंगेश गांवकर व दिलीप वेळीप या तरूणांनी दिलेल्या बलिदानाला 12 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त काल 25 मे रोजी मडगावच्या रवींद्र भवन मध्ये प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर क्रीडामंत्री गोविंद गावडे, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, एससी-एसटी गोवा आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर, एसटी महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव गांवकर व आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर, उटाचे कार्याध्यक्ष विश्वास गावडे, डॉ. उदय गांवकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. एससी-एसटी आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर पुढे बोलताना म्हणाले की, मंगेश गांवकर हे आपले खुप जवळचे मित्र होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण दरवर्षी प्रेरणा दिन कार्यक्रमाला उपस्थित राहतो. मंगेश गांवकर व दिलीप वेळीप यांना न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आपण तयारी ठेवली आहे. तसेच त्यांच्या कुंटुंबियांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी उटा व एसटी महामंडळाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
‘उटा’ भाजपच्या दावणीला बांधलेला नाही
‘उटा’ ही संघटना कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधीत नाही तसेच ती भाजपच्या दावणीला बांधलेली नाही असे क्रीडामंत्री गोविंद गावडे आपल्या भाषणात म्हणाले. युनायेट ट्रायबल असोसिएशनने (‘उटा’ने) धनगर, गावडा, कुणबी व वेळीप या सर्वांना सोबत घेऊन जात आहे. मात्र, ज्यांना काहीच शक्य होत नाही किंवा ज्यांना आपल्या स्थानाला धोका वाटत आहेत अशाच लोकांकडून टीका होत असल्याचे मंत्री श्री. गावडे म्हणाले.
एक ‘नेता’ गेला म्हणजे संघटना संपत नाही
सभापती रमेश तवडकर यांनी ‘उटा’पासून फारकत घेतली आहे. यावर भाष्य करताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, एक नेता संघटना सोडून गेला म्हणजे संघटना संपत नाही. संघटना मजबूत असून सर्व एसटी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या भाषणातून ‘गाकुवेध’ वर जोरदार टीका केली. ‘गाकुवेध’ राजकीय आरक्षणासाठी उटावर टीका करीत आहे व उग्र आंदोलनाची भाषा बोलत नाही. जर त्यांना धमक असेल तर त्यांनी उग्र आंदोलन उभे करून दाखवावे असे आव्हान मंत्री गोविंद गावडे यांनी दिले. राजकीय आरक्षणाचा मुद्दा सर्व प्रथम उटानेचे उपस्थित केला व उटाच राजकीय आरक्षण मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. विनाकारण टीका करून समाज बांधवांची दिशाभूल करू नये व समाजात फुटू पाडू नये असे ही ते म्हणाले.
खप वाढविण्यासाठी वृत्तपत्राच्या बातम्या
ज्या वृत्तपत्रांचा खप नाही अशी वृत्तपत्रे आपला खप वाढविण्यासाठी एसटी समाजात फुट पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध करीत असल्याचा टीका केली. एसटी समाजात फुट पडली नसल्याचा दावा ही त्यांनी यावेळी केला.
बुद्धिजीवी लोकांनी समेट घडवावा
समाज बांधवांच्या संघटना जरूर असाव्यात, त्यांनी आपल्या मागण्यासाठी जरूर आंदोलने करावीत, पण हे करताना समाजात दुफळी माजणार नाही याची दखल घ्यावी असे मत समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावेळी व्यक्त केले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्लीला गेल्याने आपण त्यांच्यावतीने या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे त्यांनी सांगितले. एसटी समाजातील बुद्धिजीवी व बिगर राजकीय लोकांनी पुढाकार घेऊन एसटी समाजात समेट घडवून आणावा असे आवाहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी यावेळी केले. आपले बालपण तसेच राजकीय प्रवास हा एसटी समाज बांधवांसोबतच गेला. त्यामुळे हा समाज आपल्याला जवळचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुरवातीला उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रेरणा दिन कार्यक्रमात प्रज्ञावंत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात डॉ. शंभु घाडी, कृषी क्षेत्रासाठी उमेश गांवकर, सामाजिक कार्यासाठी गोकुळदास घाडी, क्रीडा क्षेत्रासाठी कल्पेश मुळगांवकर यांना मंत्री गोविंद गावडे व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पुरस्कार प्रदान केले. एसटी समाजातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या त्यांच्या थेट खात्यात डिजिटल इंडियाच्या अंतर्गत जमा करण्याच्या उपक्रमाला या कार्यक्रमात सुरवात करण्यात आली.