आशिया चषक स्पर्धेत भारताची दुसरी व शेवटची साखळी लढत आज
दुबई / वृत्तसंस्था
आशिया चषक स्पर्धेतील सलामी लढतीत कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आज (बुधवार दि. 31) दुसऱया व शेवटच्या साखळी सामन्यात नवख्या हाँगकाँगचा एकतर्फी धुव्वा उडवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. हाँगकाँग संघातील सध्याचे खेळाडू भारत व पाकिस्तानमधील प्रथमश्रेणी क्रिकेटपटूच्या तुलनेतही बरेच नवखे आहेत. त्यामुळे, या संघासमोर असलेल्या मर्यादा आज सुस्पष्ट होण्याची बरीच शक्यता असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
यापूर्वी, पाकिस्तानविरुद्ध मागील सामन्यात शेवटच्या षटकात रोमांचक विजय संपादन केल्यानंतर भारताचे मनोबल अर्थातच उंचावलेले असेल. आज हाँगकाँगविरुद्ध लढतीत फलंदाजांना पुरेसा सराव मिळेल, इतकी कर्णधार रोहितची अपेक्षा असणार आहे.
राहुलने पाकिस्तानविरुद्ध खेळलेली लढत त्याच्यासाठी या वर्षातील पहिलीच टी-20 होती आणि त्यातही तो अपयशी ठरला. बाहेरचा चेंडू यष्टीवर ओढवून घेतल्याने त्याचीही निराशा झाली. पण, आता तुलनेने बऱयाच नवख्या हाँगकाँगच्या गोलंदाजांविरुद्ध खेळताना तो आपला हरवलेला सूर प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असेल. संघव्यवस्थापनाला केएल राहुल ज्या तडफेने आयपीएलमध्ये खेळला, तीच अपेक्षा आता त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर असणार आहे. टी-20 क्रिकेटमध्ये बऱयाचदा 20 चेंडूत फटकावलेल्या 40-45 धावाही महत्त्वाच्या असतात.
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने तयारी करत असताना संघातील महत्त्वाचा प्रत्येक खेळाडू बहरात असणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे. यंदाची आयसीसी टी-20 वर्ल्डकप दि. 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे.
आता हाँगकाँगची गोलंदाजी लाईनअप पाकिस्तानच्या तोडीची नसेल, हे सुस्पष्ट असले तरी त्यातील एखादा नवखा गोलंदाज काही धक्के देऊन गेला तर त्यातही आश्चर्याचे कारण नसेल. यामुळे संघाला सारे काही गृहित धरुनही चालणार नाही. या स्पर्धेतील सुपर-4 फेरी सुरु होण्यापूर्वी केएल राहुलसाठी ही नामी संधी असेल.
कर्णधार रोहित शर्माने यापुढेही प्रयोग सुरु राहतील, असे यापूर्वीच स्पष्ट केले असून यामुळे आजच्या लढतीत फलंदाजी लाईनअपमध्ये काही बदल झाल्यास त्यात आश्चर्याचे कारण नसेल. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध काही लाजवाब फटके मारले. आता हाँगकाँगच्या गोलंदाजांविरुद्ध त्याने आणखी तुटून पडणे अपेक्षित असणार आहे. विराटच्या खराब फॉर्ममुळे रोहितचे अलीकडील फलंदाजीतील अपयश झाकोळले गेले आहे. पण, पाकिस्तानविरुद्ध संधी गमावली, त्याची आज हाँगकाँगविरुद्ध भरपाई करुन बहरात परतण्यासाठी रोहितने अनुभव पणाला लावणे अपेक्षित असेल.
रविंद्र जडेजाला पुन्हा चौथ्या क्रमांकावर पाठवले जाणार का, याची आज उत्सुकता असेल. याचबरोबर दिनेश कार्तिकऐवजी रिषभ पंतला संधी दिली जाणार का, याचेही उत्तर संघनिवडीतून मिळेल. यापूर्वी, पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय फलंदाजी लाईनअपने ‘सेफ्टी फर्स्ट ऍप्रोच’वर भर देणे साहजिक होते. आज मात्र ते प्रतिस्पर्धी गोलंदाजीचे स्वरुप पाहता काही प्रयोग राबवू शकतील. रविचंद्रन अश्विन व रवि बिश्नोई यांना यजुवेंद्र चहल, जडेजाच्या जागी खेळवले जाणार का, याचीही आज उत्सुकता असेल.
संभाव्य संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान.
हाँगकाँग ः निझाकत खान (कर्णधार), किंचीत शाह, आफताब हुसेन, एजाज खान, अतिक इक्बाल, बाबर हयात, धनंजय राव, एहसान खान, हारुन अर्शद, स्कॉट मेकॅनी, गझनफर मोहम्मद, मोहम्मद वाहिद, आयुष शुक्ला, अहन त्रिवेदी, वाजिद शाह, यासिम मुर्तझा, झिशान अली.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
विराट कोहलीचा कसून सराव
भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहलीला पाकिस्तानविरुद्ध उत्तम प्रारंभानंतर अनपेक्षित, खराब फटक्यावर परतावे लागले होते. त्या तुलनेत आता भारतासमोर कमकुवत प्रतिस्पर्धी आहे. पण, तरी विराटने कसून सराव करण्यात अजिबात कसर सोडली नाही.
महिन्याभराचा ब्रेक घेतल्यानंतर विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 34 चेंडूत 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. माजी कर्णधार विराटने मंगळवारी सराव सत्रानंतर वर्कआऊट सेशनमधील काही छायाचित्रे कू ऍपवरुन शेअर केली.
विराटकडून पाकिस्तानी पेसर रौफला जर्सीची भेट
पाकिस्तानविरुद्ध लढतीनंतर विराट कोहलीने प्रतिस्पर्धी जलद गोलंदाज हॅरिस रौफला टीम इंडियाची जर्सी भेट दिली होती. त्याचा व्हीडिओ बीसीसीआयने आपल्या ट्वीटर हँडलवरुन शेअर केला. ‘भारत-पाकिस्तान लढत भली संपली असेल. पण, असे क्षण नेहमी संस्मरणात राहतात. विराटने हॅरीस रौफला जर्सी प्रदान करणे प्रशंसनीय होते’, असे बीसीसीआयने यात म्हटले.
सर्वाधिक टी-20 सामने खेळणारे खेळाडू
फलंदाज / देश / सामने
रोहित शर्मा / भारत / 133
शोएब मलिक / पाकिस्तान / 124
मार्टिन गप्टील / न्यूझीलंड / 121
महमुदुल्लाह / बांगलादेश / 119
मोहम्मद हाफिज / पाकिस्तान / 119
इयॉन मॉर्गन / इंग्लंड / 115
पॉल स्टर्लिंग / आयर्लंड / 114
केविन ओब्रायन / आयर्लंड / 110
जॉर्ज डॉकरेल / आयर्लंड / 105
डेव्हिड मिलर / द. आफ्रिका / 104
रॉस टेलर / न्यूझीलंड / 102
केरॉन पोलार्ड / विंडीज / 101
मुश्फिकूर रहीम / बांगलादेश / 100
विराट कोहली / भारत / 100
शकीब हसन / बांगलादेश / 100.
कोट्स
भारत-पाकिस्तान नव्हे तर मी असे म्हणेन की, क्रिकेट जिंकले! माझ्या दृष्टीने दोन्ही संघांनी अव्वल दर्जाचा खेळ साकारला. जो संघ जिंकतो, त्यांचा आनंद अवर्णनीय असतो आणि जो संघ पराभूत होतो, ते पुढील वेळी प्रयत्न करु, अशी आशा करतो. हीच तर खेळाची नजाकत आहे.
-भारताचा पहिलावहिला विश्वचषक जेता कर्णधार कपिलदेव
भुवनेश्वर कुमारची बदललेली रणनीती प्रकाशझोतात…
भुवनेश्वर कुमार एरवी प्रतितास 130 किमी वेगाने गोलंदाजी करतो. एअर-टाईम मॅक्झिमाईज करुन स्विंग गोलंदाजीवर भर, हे त्याचे बलस्थान मानले जाते. प्रारंभी, बाहेर जाणारे फुल लेंग्थ स्विंग टाकल्यानंतर शॉर्ट ऑफ लेंग्थ इनकटर टाकणे, हा त्याचा गेमप्लॅन राहत आला आहे. या गेमप्लॅनची बऱयापैकी कल्पना असल्याने जागतिक स्तरावरील फलंदाज बुमराह-शमीसारख्या तेजतर्रार मारा करणाऱया गोलंदाजांच्या तुलनेत भुवनेश्वरला सामोरे जाणे अधिक सोपे मानतात. पण, भुवनेश्वरने आपल्या बाबतीतचे मागील सर्व आडाखे बाजूला ठेवत प्रारंभीच बाबर आझमला बाऊन्सर टाकला आणि पूल हा पसंतीचा फटका असलेला बाबर आझम या जाळय़ात अलगद अडकला. सध्या सोशल मीडियावर भुवनेश्वरची ही बदलती रणनीती अधिक चर्चेत राहिली आहे.
प्रतिस्पर्धी फलंदाजांना वेगवान माऱयाने नेस्तनाबूत करण्यात भुवनेश्वरसमोर साहजिकच मर्यादा आहेत. तो शमी-बुमराहप्रमाणे भेदक यॉर्कर्स टाकत नाही. मात्र, तरीही आपल्या गोलंदाजीत सातत्याने वैविध्य आणत प्रतिस्पर्धी फलंदाजांना पेचात टाकण्यात तो अलीकडे यशस्वी ठरत आला आहे. बाबर आझमने त्याच्या या जाळय़ात अडकणे हे याचे ताजे उदाहरण आहे.
भारताच्या या स्विंग ऑफ सुलतानला सामोरे जाताना बाबर आझमचा स्टान्स लक्षवेधी होता. त्याचा बॅक लेग क्रीझनजीक आणि प्रंट लेग स्ट्राईड हेड होता. ही शैली स्विंगचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रभावी मानली जाते. या परिस्थितीत बॉलचा एअर-टाईम कमी करण्यात आणि स्विंग निष्प्रभ करण्यात यश मिळण्याची शक्यता दुणावते. स्विंग गोलंदाज गोलंदाजी करत असताना काही वेळा यष्टीरक्षक यष्टीजवळ थांबणे पसंत करतात. पण, दिनेश कार्तिकने तसे केले नाही. साहजिकच, भुवनेश्वरचा बॉलिंग प्लॅन वेगळा आहे, याचे ते लक्षण होते. पण, बाबर आझमला ते देखील लक्षात आले नाही.
भुवनेश्वरने गोलंदाजी सुरु केली, त्यावेळचे फिल्ड प्लेसमेंटही रंजक होते. 30 यार्ड सर्कलबाहेर स्क्वेअर लेग व थर्डमॅन असे दोनच क्षेत्ररक्षक तैनात होते. अर्शदीपला शॉर्ट फाईन लेगवर ईनसाईड सर्कल तैनात करण्यात आले.
एरवी, बाबर आझम पूलचा फटका मारताना अधिक बाद होतो, असा इतिहास आहे. पण, ही त्याची कमकुवत बाजू अजिबात नाही. एखादा फलंदाज त्या फटक्यावरच अधिक बाद होतो, ज्यावर त्याने आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक धावा फटकावलेल्या असतात, हे बाबर आझमबाबतही लागू होते.
पाकिस्तानी फलंदाजीचा हा भक्कम आधारस्तंभ पूलचे फटके प्रंट ऑफ द स्क्वेअर मारणे पसंत करतो. हीच बाब लक्षात घेत भारतीय थिंक टँकने लेगसाईडबाहेर एकच क्षेत्ररक्षक ठेवत त्याला पूलचा फटका मारणे भाग पाडण्याची रणनीती आखली आणि हा प्लॅन संघाला यश देऊन गेला.
बाबर आझम स्विंगचा प्रभाव कमी करण्यासाठी स्टान्समध्ये किंचीत बदल करुन उभा होता आणि त्यात प्रारंभी काही फटके मनासारखे बसत नसल्याने त्याने दडपण झुगारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भुवनेश्वरचा पुढचाच चेंडू बाऊन्सर होता आणि स्विंगची अपेक्षा करत सामोरे गेलेल्या बाबर आझमकडून मोठी चूक झाली. भुवनेश्वरचा तो चेंडू प्रतितास 140 किमी वेगाचाही नव्हता. साहजिकच, चेंडूने बॅटची कड घेतली आणि शॉर्ट फाईन लेगवरील अर्शदीपने लॉलीपॉप झेल टिपला. आधुनिक क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूंमध्ये कशी जुगलबंदी रंगते, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे!
अन् म्हणूनच जडेजाला चौथ्या स्थानी पाठवण्याची बॅकरुम आयडिया उत्तम फळली!
रविवारी पाकिस्तानविरुद्ध सलामी लढतीत रविंद्र जडेजाला चौथ्या स्थानी पाठवण्याची बॅकरुम आयडिया चांगलीच फळली होती. त्यामुळे, यापुढील महत्त्वाच्या सामन्यात भारताची रणनीती कशी असेल, याबद्दल उत्सुकता असणार आहे.
कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध फिनिशर दिनेश कार्तिकला संघात समाविष्ट करण्यासाठी भारतीय संघव्यवस्थापनाने रिषभ पंतला राखीव खेळाडूत बसवले. पण, यामुळे पहिले पाच-सहा सर्व फलंदाज राईट हँडर असणार होते. हीच बाब टाळण्यासाठी व लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनसाठी रोहित बाद झाल्यानंतर जडेजा चौथ्या फलंदाजाच्या रुपाने मैदानात उतरला आणि शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर राहत 29 चेंडूत 35 धावांची लक्षवेधी खेळी साकारली. यादरम्यान त्याने सूर्यकुमार यादवसह चौथ्या गडय़ासाठी 36 तर हार्दिक पंडय़ासह पाचव्या गडय़ासाठी 52 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारत त्याने अपेक्षाही पूर्ण केल्या!
डावखुऱया फलंदाजामुळे काय फरक पडला?
भारताने जडेजाला चौथ्या स्थानी उतरवल्यामुळे नेमका काय फरक पडला, ते ही लक्षवेधी आहे. जडेजा फिरकी गोलंदाजांवर तुटून पडण्यातही माहीर असल्याने मधल्या षटकात पाकिस्तानचा संघ फिरकीपटू नवाझकडे आणखी चेंडू सोपवू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी अन्य गोलंदाजांवर भर दिला. पण, इकडे जडेजाने अन्य गोलंदाजांचा उत्तम समाचार घेतला आणि डावातील शेवटच्या षटकात नवाझकडे चेंडू सोपवण्याशिवाय पर्याय नव्हता, त्यावेळी हीच बाब भारताच्या पथ्यावर पडली!
आता त्या षटकात नवाझच्या चेंडूवर जडेजा अनपेक्षितपणे त्रिफळाचीत झाला असला तरी पंडय़ाला विजय मिळवून देण्याची पूर्ण खात्री होती आणि त्याने उत्तुंग षटकार खेचत भारताचा गेमप्लॅन सफल केला!