प्रतिनिधी, सरवडे
आमदार प्रकाश आबिटकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून गुवाहटी गाठली.आबिटकरांना पावसाळ्यात गुवाहाटी चालते मग बिद्रीची निवडणूक का चालत नाही,असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी केला.आबिटकरांनी मुख्यमंत्र्यांना बिद्रीसंबंधी दिलेले पत्र तत्काळ मागे घेवून निवडणूक घ्यावी अन्यथा मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील,इशाराही त्यांनी दिला.
बिद्री साखर कारखान्याची निवडणूक वेळेत घ्यावी या मागणीसाठी बिद्री येथे गारगोटी-कोल्हापूर मार्गावर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने रास्तारोको करण्यात आला.त्यावेळी देवणे बोलत होते. रास्ता रोकोमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
देवणे पुढे म्हणाले,सभासद शेतकऱ्यांना ऊसदर देण्यात बिद्री कारखाना अग्रेसर आहे.कारखान्याचा कारभार उत्तम चालला असल्याने आमदारांना जनाधार मिळणे अवघड बनले आहे.याची खात्री झाल्याने सत्तेच्या माध्यमातून निवडणूक पुढे ढकलणे आणि कारखान्यावर प्रशासक आणण्याचा कुटील डाव करीत आहेत.मात्र शेतकरी त्यांचा हा डाव हाणून पडल्याशिवाय राहणार नाहीत.
उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील म्हणाले,कारखान्याच्या निवडणुकीसाठी पक्की यादी प्रसिद्ध झाल्यानंतर रीतसर निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागतो. मात्र आमदार आबिटकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पावसाळ्यात निवडणूक घेऊ नयेत.त्या पुढे ढकलाव्यात,अशा आशयाचे पत्र दिले आहे. पराभवाचे संकेत मिळाल्याने असा खटाटोप सुरू असून त्यांनी ते पत्र मागे घेऊन बिद्रीच्या निवडणूक रिंगणात उतरावे,असे आव्हान पाटील यांनी दिले. यावेळी अविनाश शिंदे,उत्तम पाटील, के. के. राजीगरे, वसंत कांबळे, बापूसो किल्लेदार, मारुती गिरी, शांता जाधव, रंजना आंबेकर, मोनिका सुर्वे, सुषमा पाटील यांच्यासह राधानगरी, भुदरगड, कागल तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते