दिवसभरात पाच ठार : एका पोलिसाचाही समावेश, 31 मे पर्यंत इंटरनेट बंद, 40 हजार लोकांचे स्थलांतर
► वृत्तसंस्था/ इम्फाळ
मणिपूरमधील कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये आरक्षणावरून 3 मेपासून हिंसाचार सुरू आहे. राजधानी इम्फाळला लागून असलेल्या सेराऊ आणि सुगनू भागात रविवारी पुन्हा एकदा हिंसक संघर्ष झाला. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यापूर्वी पुन्हा उफाळलेल्या या हिंसचारात एका पोलिसासह 5 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले. राज्यातील हिंसाचारात आतापर्यंत सुमारे 80 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पुन्हा हिंसाचार वाढल्यामुळे 31 मे पर्यंत इंटरनेटवरही बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या तणावामुळे राज्यातून आतापर्यंत 40 हजार लोकांनी स्थलांतर केले आहे.
राज्यात 26 दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात पोलिसांनी रविवारी 40 जणांचे एन्काउंटरही केले. राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी या चकमकींना दुजोरा दिला आहे. त्यांनी चकमकीत मारल्या गेलेल्यांना ‘दहशतवादी’ असे संबोधले आहे. ठार करण्यात आलेल्या बंडखोर लोकांकडे एम-16, एके-47 असॉल्ट रायफल आणि स्नायपर गन सापडल्याचा दावा करत त्यांनी सामान्य नागरिकांवर हल्ला केल्याचे स्पष्ट केले आहे.
मणिपूरमधील कुकी जमातीचे लोक मैतेई समुदायाला एसटीचा दर्जा देण्याच्या विरोधात 3 मेपासून आंदोलन करत आहेत. चुराचंदपूर येथे 3 मे रोजी रात्री निदर्शनादरम्यान दोन्ही समाजाचे लोक एकमेकांशी भिडले. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा 4 मे रोजी कार्यक्रम चुराचंदपूरमध्येच निश्चित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ आणि मंडप आंदोलकांनी जाळले होते. यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली. केंद्र सरकारला राज्यात लष्कर आणि निमलष्करी दल तैनात करावे लागले. अनेक जिह्यांमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी अजूनही सुरू आहे.
गृहमंत्री अमित शहा दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 29 मे ते 1 जून या कालावधीत राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी संध्याकाळी ते राजधानी इम्फाळला दाखल झाले. राज्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून ते प्रथमच मणिपूरला पोहोचले आहेत. राज्यात सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी ते राज्य सरकार, सुरक्षा दल आणि कुकी-मैतेई समुदायाच्या लोकांची भेट घेणार आहेत. याठिकाणी इतर सामाजिक संस्था आणि तज्ञांचीही ते भेट घेणार आहेत. यापूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी राज्याचा दौरा केला होता. 27-28 मे रोजी लष्करप्रमुख दोन दिवस मणिपूरमध्ये होते.