कमी भरतीमुळे गंगासागरकडे जाणाऱया दोन बोटी वाळूत अडकल्या
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालजवळील समुद्रात सुमारे 600 यात्रेकरू अडकल्याची घटना नुकतीच घडली. हुगळी नदी आणि बंगालच्या उपसागराचा संगम असलेल्या गंगासागरमध्ये हे भाविक पवित्र स्नान करण्यासाठी निघाले होते. मात्र रविवारी रात्री कमी भरती आणि दाट धुक्मयामुळे त्यांची बोट काकद्वीपजवळ अडकली. बोटी वाळूत अडकल्यामुळे त्यांचा पुढील प्रवास खोळंबला. बोटी अडकल्यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी अन्य मार्गांचा वापर करण्यात आला.
एमव्ही लक्ष्मीती आणि एमव्ही अग्रमती नावाच्या बोटी सुमारे 600 यात्रेकरूंना सागर बेटातील गंगासागर मेळय़ापासून काकद्वीपकडे घेऊन जात होत्या. याचवेळी त्या समुद्रभागात अडकल्या. त्यानंतर तटरक्षक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. हल्दिया आणि प्रेजरगंज येथून दोन एसीव्ही (हॉवरक्राफ्ट) ताबडतोब मागविण्यात आली. त्यानंतर सर्व भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
गंगासागर येथे कपिल मुनींचा खूप जुना आश्रम आहे. या ठिकाणाला भगवान विष्णूंचा अवतार समजले जाते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशभरातून शेकडो भाविक पवित्र स्नानासाठी येथे पोहोचतात. कुंभनंतर देशातील सर्वात मोठी यात्रा येथे भरते. या यात्रेत 15 ते 20 लाख लोक सहभागी होतात. गंगासागरावर येणे ही भाविकांसाठी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी असल्याचा दावा कपिल मुनी आश्रमाचे पुजारी अजित दास करतात.