प्रतिनिधी,कोल्हापूर
खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून पेरणीसाठी आता बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.जून महिना उजाडला तरी अद्याप पावसाने जोरदार हजेरी लावलेली नसल्याने जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे.मृग नक्षत्राला सुरुवात झाल्याने एक पाऊस झाल्यानंतर पेरणीसाठी झुंबड उडणार आहे.
जिल्ह्यात 1 लाख 96 हजार 466 हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे.साधारणत 25 मे पासून धुळवाफ पेरण्या सुरु होतात.मे च्या शेवटच्या आठवड्यातील वळीव पावसाने त्याची उगवण होऊन मृग नक्षत्रात त्यांची कोळपण मिळते.मात्र यंदा जोरदार वळीव पाऊस झालाच नसल्याने धुळवाफ पेरण्या खोळंबल्या आहेत. गुरुवारी सायंकाळपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे.या नक्षत्राचे वाहन हत्ती असल्याने कमी-जास्त प्रमाणात पाऊस राहिल असा अंदाज बळीराजाचा आहे.त्यामुळे पेरणीसाठी आता बळीराजाचे लक्ष दाटून येणाऱ्या आभाळाकडे लागून राहिले आहे.
खते, बियाणे विक्रेत्यांचेही पावसाकडे लक्ष
खरीपासाठी लागणारी बियाणे,किटकनाशके व खतांनी विक्रेत्यांची गोडावून फुल्ल आहेत.मात्र पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकरी बियाणे, खते, किटकनाशके खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे खते, बियाणे विक्रेत्यांचेही आता पावसाकडे लक्ष लागून राहिले आहे.
35 हजार 254 क्विंटल बियाणांची आवश्यकता
खरीप हंगामातील 1 लाख 88 हजार 885 हेक्टरवरील प्रमुख पिकांसाठी एकूण 35 हजार 254 क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. यासाठी सार्वजनिक क्षेत्रातून 22 हजार 915 क्विंटल तर खाजगी क्षेत्रातून 12 हजार 339 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहेत.
दीड लाख मेट्रीक टन खतांची गरज
खरीप हंगाम 2023-24 साठी 1 लाख 57 हजार 251 मेट्रीक टन रासायनिक खतांचे आवटन देण्यात आले आहे. एप्रिल 2023 अखेर 29 हजार 539 मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. हंगामात खते, बी-बियाणांची कमतरता भासणार नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यातील खरीप पिकांचे सर्वसाधरण क्षेत्र व 2023-24 च्या हंगामातील उद्दीष्ट ठेवलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे –
पिकाचे नाव सर्वसाधारण क्षेत्र 2023-24चे उद्दीष्टीत क्षेत्र (हेक्टरमध्ये)
भात 92,320 96 हजार
नाचणी 17,100 20 हजार
भुईमूग 35,312 40 हजार
सोयाबीन 42,274 44,300
कडधान्य 3790 4600