मंत्री गोविंद गावडे यांच्या वक्तव्याने सभागृह अचंबित : कला अकादमीच्या दुरुस्तीवरुन जोरदार खडाजंगी
प्रतिनिधी /पणजी
कला अकादमीची तुलना ’ताज महलशी’ करणे कला व संस्कृती मंत्र्यांना बरेच महागात पडले आणि आमदार विजय सरदेसाई यांच्या आक्रमक पवित्र्यासमोर मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांचीही बोलती बंद झाली. या विषयावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. त्यातून ’कलेच्या’ विषयावरून विधानसभेत चाललेले ’संस्कृतीचे’ अनोखे दर्शन गोमंतकीयांना घडले. या प्रकरणाची आता उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी, तोपर्यंत काम बंद ठेवावे आणि कंत्राटदाराची बिलेही स्थगित ठेवण्यात यावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली. अन्यथा महाराष्ट्र सदनच्या घोटाळ्यात ज्याप्रकारे छगन भुजबळ गजाआड झाले होते, त्याची पुनरावृत्ती गोव्यात होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेल्या कला अकादमीच्या विषयावरून सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित केला होता. कला अकादमीचे बांधकाम करण्यात आले तेव्हा केवळ चार कोटी खर्च आला होता. आता दुरुस्तीसाठी 49 कोटी कसे? त्याचबरोबर सीपीडब्ल्यूडीची नियमावली न पाळता व निविदा जारी न करताच कंत्राट बहाल करण्यामागे कोणते उद्दीष्ट होते, असे सवाल त्यांनी उपस्थित केले होते.
त्यावर बोलताना मंत्री गोविंद गावडे यांनी सदर कंत्राटदार कंपनीला अशा कामांचा फार मोठा अनुभव होता. कामही गतीने पूर्ण करणे आवश्यक होते. त्याशिवाय कंत्राटदार अर्ध्यावरच काम सोडून जाऊ नये, यासाठीही निविदा जारी न करताच काम बहाल करण्यात आले होते, असे सांगितले.
मात्र त्या उत्तरावर समाधान न झालेल्या सरदेसाई यांनी याच कंपनीला यापूर्वी देण्यात आलेले काम पूर्ण करण्यात अपयश आल्याचे उदाहरण दिले. त्यावरून मंत्र्यांना उघडे पाडण्याचे प्रयत्न त्यांनी केले. अशाप्रकारे प्रत्येक उत्तरावर तोंडघशी पडत असल्याने शेवटी मंत्र्यांनी कला अकादमीची तुलना ’ताज महालशी’ करण्याचा प्रयत्न केला. ताज महाल बांधताना तो केवळ सुंदर दिसावा हेच एकमेव ध्येय शहाजहानने ठेवले होते. त्यामुळे त्यांनी कंत्राटे वगैरे दिली नाहीत, असे मंत्री म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहातील सर्वजण अचंबित होऊन एकदुसऱयाकडे पाहू लागले.
वास्तुचे काम प्रारंभापासूनच सदोष
पुढे बोलताना गावडे यांनी कला अकादमीच्या वास्तुचे काम प्रारंभापासूनच सदोष होते असा दावा केला. प्रत्येक पावसाळ्यात या वास्तुच्या तळाशी पाणी तुंबत होते. मुख्य थिएटरसह ब्लॅक बॉक्समध्येही पाणी भरत होते. त्यामुळे पंप लावून ते बाहेर फेकण्यात येत होते, याचे आम्ही प्रत्येकजण साक्षी आहोत. आपण अकादमीचा अध्यक्ष असलो तरी पेशाने अभियंता आहे. त्यामुळे या वास्तुच्या कमकुवत स्थितीची जाणीव होती. म्हणुनच तातडीने दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले होते. सीपीडब्ल्यूडी नियमावली पाळूनच काम बहाल करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
दुरुस्तीकाम हाती घेण्यापूर्वी चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनकडे सल्ला मागितला होता. संपूर्ण प्रकल्पाच्या वर मंडपरुपी छत उभारण्याचाही विचार बोलून दाखवला होता. परंतु ’अकादमी वास्तुची रया जाईल’ असा दावा करत फाऊंडेशनने त्यास विरोध केला, अशी माहिती गावडे यांनी दिली. कला अकादमी इमारतीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणताही ठोस तोडगा देण्यात ते असमर्थ ठरले, असा दावा गावडे यांनी केला. त्याचबरोबर या इमारतीच्या बांधकाम मुद्यावरून सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल त्यांनी विजय यांचाही समाचार घेतला.
सरदेसाईच्या प्रश्नांसमोर मुख्यमंत्रीही निरुत्तर
मंत्री गावडे आणि सरदेसाई यांच्यात चाललेल्या या अखंडित वाप्युद्धात गावडे यांच्या बचावासाठी उभे राहिलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, ’कला अकादमीचे दुरुस्तीकाम एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. त्यामुळे निविदा न काढता कंत्राट बहाल करण्यात आले होते’, असे सांगण्याचे प्रयत्न केले. मात्र या वक्तव्यावर बोट ठेवत सरदेसाई यांनी, दोन वर्षे होत आली तरी काम पूर्ण का होत नाही? असा प्रतिप्रश्न केला. तसेच नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम निविदा प्रक्रियेतून देण्यात आल्याचे उदाहरण त्यांनी दिले. सरदेसाई यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवरून अखेर मुख्यमंत्री निरुत्तर झाले. मात्र या प्रकरणी आता आपण स्वतः लक्ष घालून येत्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापूर्वी कला अकादमी खुली करण्याचे प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. त्यानंतर या वादावर पडदा पडला.