पेव्हर्स घालताना जुन्या रस्त्यांची खोदाई, नळजोडणी तोडल्यामुळे जोडणीकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. याकरिता विविध रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. पण या स्मार्ट रस्त्यांच्या विकासामुळे टिळकवाडी भागातील नागरिकांच्या घराची नळजोडणी तोडण्यात आली आहे, तर काही भागात सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
टिळकवाडी परिसरातील रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आला आहे. या परिसरातील प्रत्येक रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात आले आहेत. त्याकरिता जुन्या रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. रस्ता करताना काही घरांच्या नळाची जोडणी तोडण्यात आली होती. रस्ता करताना नळांची जोडणी करण्यात आली नाही. महापालिका आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांकडे सातत्याने तक्रारी करूनही याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना नळजोडणीसाठी धावपळ करावी लागत आहे. नळजोडणी करण्याची विनंती एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांकडे केली असता महापालिकेकडून रस्ता खोदण्याची परवानगी घ्या, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता रस्ता खोदाईला परवानगी घेण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. वास्तविक पाहता तोडलेल्या नळजोडण्या पुन्हा जोडून देण्याची जबाबदारी स्मार्ट सिटी कंपनीची आहे. मात्र जबाबदारी टाळण्याचा प्रकार अधिकाऱयांनी चालविला असल्याची तक्रार होत आहे. तसेच या भागातील काही ठिकाणी जलवाहिन्या घालताना नवीन व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. मंगळवारपेठेसह विविध भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या आठ दिवसांपासून टिळकवाडी भागात पाणीपुरवठा करण्यात आला नाही. आठ दिवसानंतर पाणीपुरवठा केला, पण केवळ अर्धा तासच पाणी सोडण्यात आले. त्यामुळे मुबलक पाणीपुरवठा झाला नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
पाणी मुबलक मिळत नसल्याने नागरिकांनी एल ऍण्ड टी कंपनी आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली असता जबाबदारी झटकण्यात येत आहे. उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार अनेकवेळा करण्यात आली. पण अधिकाऱयांनी याची दखल घेतली नाही. स्मार्ट सिटीच्या कामामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. टिळकवाडी भागातील पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.