जांबोटी / वार्ताहर
ओलमणी परिसरातील वीजपुरवठा गेल्या आठ दिवसापासून पूर्णपणे गायब झाल्याने वीजेअभावी सार्वजनिक नळपाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाल्यामुळे ऐन पावसाळय़ात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
सुमारे 3000 लोकसंख्या असलेल्या ओलमणी गावासाठी घरोघरी नळपाणी योजनेद्वारे मलप्रभा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. उन्हाळय़ात ग्रामस्थांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येतो. पावसाळय़ात जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत नदीला महापूर येत असल्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाल्यामुळे सदर पाणीपुरवठा बंद करण्यात येतो. तसेच गावातील सार्वजनिक विहिरींचे पाणी देखील पिण्यासाठी योग्य नाही. शिवाय गावात एकही कूपनलिका कार्यान्वित नसल्यामुळे ऐन पावसाळय़ात गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई उदभवते. पाण्याअभावी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मागील वर्षापासून ग्रामपंचायतीने पावसाळय़ात शेतवाडीतील खासगी कुपनलिकांचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध केल्यामुळे काही प्रमाणात पाणीटंचाई दूर झाली आहे. मात्र गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ओलमणी परिसरातील वीजपुरवठा गायब झाल्यामुळे वीजेअभावी कुपनलिका देखील बंद झाल्यामुळे ग्रामस्थांना आठवडय़ातून दोनवेळा होणारा पाणीपुरवठा देखील बंद झाल्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई उदभवली आहे. सुरळीत वीजपुरवठय़ाअभावी ग्रामपंचायत देखील पाणीपुरवठा करण्यासाठी हतबल बनली आहे. तरी हेस्कॉमच्या खानापूर उपविभागाच्या अधिकारी वर्गाने लक्ष घालून ओलमणी परिसरतील वीजपुरवठा सुरळीत करून नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.