विविध भागात दोन दिवस पाणी नाही
प्रतिनिधी /बेळगाव
गॅसवाहिनी घालण्यासाठी खोदाई करताना शहापूर परिसराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शहापूर, हिंदवाडी, सर्वोदय कॉलनी, रानडे कॉलनी, खासबाग, भारतनगर, जुने बेळगाव आदी परिसराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मुख्य जलवाहिनीलाच गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे.
शहरात पाणीपुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाल्याने विविध परिसरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. अशातच जलवाहिन्यांना गळत्या लागण्याचे प्रकार वाढले आहेत. जलाशयामध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक असतानादेखील शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. शहर आणि उपनगरात जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम व्यवस्थित होत नसल्याने पाणी समस्या निर्माण होत आहे. शहरात गॅसवाहिन्या घालताना जलवाहिन्यांचे नुकसान होऊन गळत्या लागण्याचे प्रकार वाढले आहेत. मंगळवारी मुख्य जलवाहिनीचे नुकसान होऊन जलवाहिनीला मोठय़ा प्रमाणात गळती लागली.
नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन…
शहापूर, जुने बेळगाव परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्यजलवाहिनी असल्याने गळतीद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया गेले. सध्या सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. अशातच गळतीमुळे शहापूर, हिंदवाडी, सर्वोदय कॉलनी, रानडे कॉलनी, खासबाग, भारतनगर, जुने बेळगाव भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाई समस्येत भर पडली आहे. सदर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून दि. 20 आणि 21 असे दोन दिवस पाणीपुरवठा करता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एलऍण्डटी कंपनीने केले आहे.