ऑनलाईन टीम/तरुण भारत
Maratha Kranti Morcha On Chhatrapati Sambhajiraje : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा प्रलंबित आहे. याबाबत सातत्याने संभाजीराजे छत्रपती भूमिका मांडत आहेत. आता मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या नेत्तृत्वाखाली काम करण्यास नकार दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाला आधीपासूनच कोणतंही नेत्तृत्व नाहीये, त्यामुळं संभाजीराजे यांनी मराठा संघटनांचं नेत्तृत्व करू नये, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली आहे. कारण काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, त्यानंतर मराठा संघटनांमध्ये नाराजीचं वातावरण होतं, त्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चानं (Maratha Kranti Morcha) संभाजीराजेंनी आमचं नेत्तृत्व करू नये, अशी रोखठोक भूमिका घेतली आहे.
शुक्रवारी रात्री मराठा समाजाच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis), महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अर्जुन खोतकर, संभाजीराजे छत्रपती आणि मराठा मोर्चाचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीत बोलूच दिलं नसल्याचा आरोप नंतर मराठा समाजाच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी संभाजीराजेंचं नेतृत्वच मान्य नसल्याचा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी हे वक्तव्य केलं.
औरंगाबादेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले की, मराठा समाजाच्या प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारमार्फत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील या बैठकीसाठी सुनील कोटकर, सतीश वेताळ आणि चंद्रकांत भराटही गेले होते, परंतु त्यात कोटकर, भराट आणि वेताळ यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला नाही, यावरून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांमध्ये नाराजी पसरली, याशिवाय बैठक सुरू होण्याच्या आधीच संभाजीराजे यांनी बैठकीत कुणीही काही बोलू नका, नाही तर मी बैठक सोडून निघून जाईन, असं सांगितलं, अशा पद्धतीनं त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा आवाज दाबण्याच्या प्रयत्न केल्याचं सांगत भानुसे यांनी संभाजीराजेंनी मराठा संघटनांचं नेत्तृत्व न करण्याचं वक्तव्य केलं आहे.
‘संभाजीराजे अंधारात बैठका घेत आहेत याचा अर्थ काय’
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं नेत्तृत्व असून संभाजी राजे हे रात्रीच्या अंधारात बैठका का घेत आहेत?, बैठकीसाठी सर्वांना का बोलावलं जात नाहीये? मोजक्याच लोकांसोबत काय चर्चा केली जा आहे? असे प्रश्न क्रांती मराठा मोर्चानं उपस्थित केले आहेत, याशिवाय मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन हे छत्रपती संभाजीनगरमधून सुरू झालेलं असून तेथीलच मराठा नेत्यांचा वारंवार अपमान केला जात असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. संभाजी राजे यांच्या आजूबाजूची मंडळी राजकीय पोळी भाजण्याचं काम करत असून त्यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हा डाव रचल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला आहे.
“..तर पळता भुई थोडी करू”
“मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व कुणीही नाहीये. छत्रपती संभाजीनगर शहरातून तो सुरू झाला आहे. आम्ही सगळे त्या मोर्चाचे शिलेदार आहोत. जवळचा एखादा माणूस हाताशी धरून आणि त्या नेतृत्वाला पुढे करून जर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायचा प्रयत्न करत असाल, तर लक्षात ठेवा, तुम्हाला पळता भुई थोडी होईल अशी तुमची अवस्था केल्याशिवाय आम्ही राहणार नाही”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.