15 नोव्हेंबर पासून कालव्यातून पाणी सोडणार
प्रतिनिधी /मडगाव
गोव्यात शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार खुप गांभीर्याने विचार करीत आहे. यंदाच्या हंगामात 15 नोव्हेंबर पासून कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. यात कोणताच बदल होणार नसल्याची माहिती जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल मडगावात दिली. कालव्यातून पाणी सोडल्यानंतर त्या पाण्याचा पुरेपूर वापर शेतकऱयांनी करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱयांना कोणतीच समस्या निर्माण होऊ देणार नाही. मुबलक पाणी उलपब्ध केले जातील. यंदा 15 नोव्हेंबर पासून कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय जलस्त्रोत खात्याने घेतला आहे. या निर्णयात कोणताच बदल होणार नाही. शेतकऱयांनी त्या दृष्टीकोनातून तयारीला लागणे आवश्यक आहे. यासाठी केपे मतदारसंघात सुमारे 400 शेतकऱयांचा भव्य मेळावा 29 किंवा 30 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाणार असल्याची माहिती मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
जलस्त्रोत खाते संकुचित कामे करू शकत नाही. जलस्त्रोत खाते नाल्यातील गाळ उपसणे या पर्यंत मर्यादित राहणार नाही. खाते विशाल दृष्टीकोन ठेऊन काम करणार आहे. बंधारे बांधतानाच पारंपारिक जलस्त्रोत साठे विकसित केले जातील. जेणे करून त्याचा लाभ हा शेतीला होईल. जलस्त्रोत खात्याचे अधिकारी व शेतकरी यांच्यात एक नाते निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न असतील, जेणे करून युवा वर्ग शेतीकडे आकर्षित होईल. शेतकऱयांना सहकार क्षेत्रातून देखील पाठिंबा दिला जाईल अशी माहिती मंत्री शिरोडकर यांनी दिली.
पूर्वे पाण्याचे व्यवस्थापन होते…
मंत्री शिरोडकर पुढ म्हणाले, आपण मंगळवारी नावेली मतदारसंघाला भेट दिली. या भेटीच्या दरम्यान, आपल्याला आठ-दहा ठिकाणी पूर्वीच्या काळात पाण्याचे व्यवस्थापन कशा प्रकारचे होते याची माहिती मिळाली. आत्ता पाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झालेले आहे. पण, आत्ता पाण्याचे पुन्हा व्यवस्थापन करण्याचे आदेश आपण जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱयांना दिले आहेत. नावेली मतदारसंघात शेती करणारे बरेच शेतकरी आहेत. त्यांची आपण यादी तयार करण्यास आमदार उल्हास तुयेकर यांना सांगितली आहे. जेणे करून या शेतकऱयांना प्रोत्साहन देणे शक्य होईल.
गोव्यात एकूण 150 तळी
दक्षिण व उत्तर गोव्यात मिळून 150 तळी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दोन्ही जिल्हय़ात प्रत्येकी 75 तळी आहेत. या तळय़ाचे संवर्धन केले जाईल. या पैकी बऱयाच तळय़ाचा वापर हा शेती-बागायतीसाठी केला जातो. आज गुरूवारी आपण काणकोण तालुक्याला भेट देणार असून त्याठिकाणी दोन तळय़ाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आज सकाळी 9.30 वा. बाणावली मतदारसंघाला तर 10.30 वा. केपे मतदारसंघातील बेतुल आणि दुपारी 12.30 वा. काणकोण तालुक्याला भेट देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संध्याकाळच्या सत्रात काणकोणात सुमारे 300 शेतकऱयांचा मेळावा घेतला जाईल. या मेळाव्यात शेतकऱयांना नवीन मसाल्याची झाडे वितरित केली जातील.
मच्छसंपदा तयार करणार
मच्छसंपदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारचे 1 कोटी रूपयांची तरतूद आहे. गोडय़ा पाण्यात तसेच समुद्राच्या पाण्यात मच्छसंपदा तयार करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. आपल्या शिरोडा मतदारसंघात 25 युवकांना मच्छसंपदा प्रकल्पासाठी प्रात्सोहन दिले जाणार आहे. एसटी समाजातील युवकांनी देखील मच्छसंपदेसाठी पुढे येणे आवश्यक आहे. त्यांना या योजनेचा प्रभावी लाभ होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
गोव्यातील 30 मतदारसंघ हे कृषी प्रधान आहे. या मतदारसंघातील शेतकऱयांनी आपली शेत जमिन पडिंग सोडू नये. शेतकऱयांना कामगार उपलब्ध होत नाही. ही खरी समस्या आहे. गोव्यातील युवक शेतीची कामे करण्यास पुढे येत नाही. अशा वेळी पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने सरकार विचार करीत असल्याचे मंत्री शिरोडकर म्हणाले.
साळ नदी ही सासष्टीची जीवन वाहिनी…
साळ नदी ही सासष्टीची जीवन वाहिनी आहे. मात्र, ही नदी मोठय़ा प्रमाणात प्रदूषित होत आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. नदीचे प्रदूषण करणे हा गुन्हा आहे. त्या दृष्टीकोनातून देखील सरकार विचार करणार आहे. पुढील दोन वर्षात साळ नदी प्रदूषण मुक्त करण्याचे सर्व प्रयत्न केले जातील अशी माहिती देण्यात आली. साळ नदीचा गाळ उपसण्याचे काम दोन टप्प्यात हातात घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले असून दुसऱया टप्प्याचे काम नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हाती घेतले जाईल. साळ नदीचा उगम नागोवा-वेर्णा येथे होत असून तिथ पर्यंत गाळ उपसला जाईल अशी माहिती देण्यात आली.
मंत्री शिरोडकर दर महिन्याच्या तिसऱया गुरूवारी मडगावात
जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर दर महिन्याच्या तिसऱया गुरूवारी मडगावातील भाजपच्या कार्यालयात सासष्टीतील भाजप कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध होतील. सासष्टी पासून काणकोण पर्यंतचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी भेटू शकतात असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे दक्षिण गोवा अध्यक्ष तुळशीदास नाईक, शर्मद पै रायतूरकर, फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर, नवीन पै रायकर व मडगावच्या नगरसेविका बबिता नाईक उपस्थित होत्या.