पाण्यासाठी नागरिकांची वणवण, विहिरींमधील गाळ काढण्याकडे नागरिकांचा कल
प्रतिनिधी / बेळगाव
सध्या पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यामुळे अनेक समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर मोठी समस्या निर्माण होणार यात शंका नाही. दरम्यान पाण्यासाठी नागरिक वणवण करत आहेत. काही ठिकाणी विहिरींमधील गाळ काढण्याकडेही अनेकांनी कल दिला आहे. सध्या विहिरींनी तळ गाठल्याने अनेकांची भिस्त आता वरुणराजावर विसंबून आहे. त्यामुळे पाऊस झाला तरच पाणी समस्या मिटणार आहे. यावर्षी वळिवाने दडी मारल्याने पाणीपातळीवर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी विहिरींनी तळ गाठला आहे. शहरात अनेक नागरिकांच्या विहिरी आहेत. तसेच सार्वजनिक विहिरीही आहेत. परंतु शहरातील अनेक भागातील सर्रास विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एकीकडे पाणीपुरवठा विभागाकडून आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागत आहे.
पावसाअभावी शहराच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला असून आठवड्यातून फक्त एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे अनेकांनी गाळ काढण्याचे काम हाती घेतल्याचे दिसून येत आहे. बेळगाव परिसरात पाण्याची पातळी चांगली असते. त्यामुळे परिसरातील विहिरींमध्ये चांगल्याप्रकारे पाणी उपलब्ध होते. मात्र यावर्षी कमी पावसामुळे फटका बसला आहे. त्यामुळे विहिरींमधील पाणी पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर आहे.
तलावांना जलपर्णीचा विळखा
अनेक अपार्टमेंटमध्ये एकच विहीर खोदून पाणीपुरवठा केला जातो. परंतु या विहिरींमधीलही पाणी कमी झाल्याने अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आठवड्यातून एकदा येणाऱ्या पाण्यावरच अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. आपल्या भागात पाणीपुरवठा करावा यासाठी सातत्याने विविध भागातील नागरिक पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अधिक प्रमाणात पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत आहेत. शहरातील काही भागात तलाव आहेत. पण तलावांना जलपर्णीने विळखा घातला आहे. तसेच गाळही वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही जनावरांना पाणी पाजण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी कमी पावसामुळे जनावरांना पाण्याची समस्या निर्माण होत आहे. याकरिता तलावांची स्वच्छता करून हे तलाव शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. शहरात असणारे तलाव नागरिकांना व शेतकऱ्यांना सोयीचे होत होते. शहरात आजही अनेक शेतकरी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत. शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्याबरोबरच जनावरांसाठीही हे तलाव उपयोगी पडत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून लघुपाटबंधारे विभागाचे या तलावांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच ड्रेनेजचे सांडपाणी तलावांमध्ये मिसळत असल्याने व नागरिक तलावांमध्ये कचरा टाकत असल्याने हे तलाव सध्या बिनकामाचे बनले आहेत.