शिवसेना खासदार संजय राऊत यांचा संतप्त सवाल
प्रतिनिधी/मुंबई
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य करून 72 तास उलटले. तरीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DY CM Devendra Fadnavis) गप्प का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हीच वेळ बदला घेण्याची असून यावेळी राज्यपालांचा राजीनामा घ्या असे आवाहन खासदार राऊत (MP Sanjay Raut) यांनी केले आहे. रविवारी पत्रकार परिषद घेत राऊत यांनी राज्यपाल भगितसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर जोरदार टीका केली.
दरम्यान शनिवारी औरंगाबादेत असताना राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. हे विधान दळभद्री असून भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असल्याचे असे वक्तव्य एका नॅशनल चॅनेलवर केले असल्याचे सांगितले. भाजपने शिवसेना फोडली. यातून मिंधे सरकार सत्तेवर आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपचे राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गप्प का? भाजपची देखील हीच भूमिका आहे का? संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकत असल्याचे सांगत राऊत यांनी संताप व्यक्त केला.
राज्यपालांनी यापूर्वीही शिवाजी महाराजांचा तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. एका वर्षात या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार वेळेस दुखावले आहे. हीच आपली अधिकृत भूमिका आहे का?, हे आता भाजपला सांगावेच लागेल. वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त बोलल्यास भाजप पेटून उठतो. जोडे मारो आंदोलन करतो. त्याचे स्वागत आहे. मात्र, शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल हे जोडे आता कोणाला मारणार. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना मारणार की राज्यपालांना मारणार? असा संतप्त सवालही राऊत यांनी उपस्थित केला. मात्र महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्यांविषयी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य आम्ही सहन करू शकत नाही. स्वाभिमानाच्या गप्पा मारत मिंधे गट मविआतून बाजूला झाला. आता या 40 आमदारांचा स्वाभिमान कुठे गेला? एकानेही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला नाही. सरकारने राज्यपालांचा त्वरीत राजीनामा घ्यावा. अन्यथा शिवसैनिक जोडे मारो आंदोलन करणार. शिवसैनिकांचे जोडे कसे असतात, हे कळेल.
पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेतात? नौदलाला शिवरायांचे बोधचिन्ह का देण्यात आले आहे? शिवरायांचा अपमान सहन करता तर अफझल खान, औरंगजेबाची कबर पाडण्याचे नाटक का करता? वीर सावरकर हे शिवरायांची आरती करत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे वीर सावरकरांचे प्रेरणास्त्रोत होते. केवळ सत्तेला चिकटून बसण्यासाठी मिंधे गट आता शांत आहे. महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय अशी जहाल टीका राऊत यांनी रविवारी केली.