कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून कार्यरत : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाचा कळस
बेळगाव : तालुका पंचायतचा कारभार दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. त्यामुळे येथे अनेक गैरप्रकार सुरू आहेत. अनेक वर्षांपासून तळ ठोकून असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने समस्या निर्माण होत आहेत. दरम्यान 10 ते 15 वर्षे झाली तरी त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. त्यामुळे त्यांचे फावत चालले असून अनेक नागरिकांना त्रासदायक असे प्रकार घडत आहेत. तेव्हा त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. बेळगाव तालुका पंचायत कार्यक्षेत्रात 58 ग्रामपंचायती येतात. त्यामुळे येथील कारभार सुधारण्यासाठी तालुका पंचायतमध्ये अनेकदा निवेदने व आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अनेक पीडीओंचाच कारभार संशयाच्या भोवऱ्यात असतो. हा सारा प्रकार घडत असतानाही अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. याचबरोबर विशेष करून तालुका पंचायतमध्ये असणाऱ्या अनेक पीडीओंची ग्राम पंचायतीला बदली करणे गरजेचे असते. मात्र कायमस्वरुपी त्याच ठिकाणी ठेवण्यात आल्याने समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे त्यांच्या बदली करण्याकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मार्च एन्ड आले की, तालुका पंचायतमध्ये कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकारीवर्ग करू लागतात. कनिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करून त्यांची बिले ताबडतोब अदा करा, असे सांगतात. कारण टक्केवारीची मलई खाण्यासाठीच त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू असतात. दरम्यान यामध्ये स्थायिक झालेल्या काही पीडीओ अधिकाऱ्यांची वरकमाई मोठ्या प्रमाणात होत असते. हा सारा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला तरी आपण सारे एकाच माळेतील मणी असल्याप्रमाणे असे अनेक प्रकार घडतात. मात्र त्याकडे कानाडोळा करण्यातच अधिकाऱ्यांनी धन्यता मानली आहे. त्यामुळे तशा अधिकाऱ्यांची बदली करण्याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. काही अधिकाऱ्यांनी तर आमदारांच्या पाया पडून आपली याच ठिकाणी वर्णी असूदे, असे सांगितले आहे. त्यामुळे सुरूवातीला जो पदभार स्वीकारला आहे त्याच ठिकाणी त्यांनी आपली मक्तेदारी ठेवली आहे. हे सारे खरे असले तरी त्यांची बदली होत नाही. आणि बदली झाल्यास लोकप्रतिनिधींच्या पाया पडून पुन्हा त्याच ठिकाणी रुजू होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांची मोठी टोळीच बनल्याचे दिसून येतआहे. काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी या साऱ्यापासून दूर राहण्यासाठी स्वत:हून बदली करून घेतली आहे. सर्वाधिक पैसा कमविण्याचे माध्यम म्हणून ता. पं. कडे पाहिले जाते. मात्र यापूर्वी असलेल्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून नागरिकांची सेवा केली आहे. पण सध्या तसे होताना दिसत नाही. काही समविचारी कंत्राटदार, अभियंते, ता. पं. महिला अधिकाऱ्यांना हाताशी धरून साटेलोटे करण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची बदली होणे ही काळाची गरज बनली आहे.