फारुख अब्दुल्लांचा केंद्र सरकारला सवाल ः धर्माची रेषा काढून देशाला विभागू नका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार देशाला धार्मिक रेषा काढून विभागत असून हा प्रकार रोखला पाहिजे. देशात भीती आणि द्वेषाचे राजकारण नवे नाही. सरकार 22-24 कोटी मुस्लिमांसोबत काय करणार? या मुस्लिमांना समुद्रात नेऊन बुडविणार का चीनमध्ये पाठविणार असे प्रश्नार्थक विधान अब्दुल्ला यांनी केले आहे.
महात्मा गांधी हे रामराज्याबद्दल बोलायचे याचा अर्थ सर्व लोकांना समान संधी आणि कुणासोबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही असा देश आहे. आम्हा सर्वांनी गांधींच्या आदर्शांनुसार वागणे अपेक्षित आहे. समुदायांना परस्परांच्या विरोधात उभे केले जाऊ नये असे अब्दुल्लांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील स्थिती योग्य नाही, जम्मू-काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा हटवून दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये याची विभागणी पूर्ण देशासाठी मोठी समस्या आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. आम्ही या देशाचे आहोत, मग आम्हाला अशी वागणूक का मिळतेय? आम्ही देशविरोधी नाही असे अब्दुल्ला म्हणाले.
निवडणूक आयोगाची भेट घेत आम्ही निवडणूक लवकरात लवकर घेण्याची मागणी करणार आहोत. तसेच जम्मू-काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा परत मिळवून देण्यासाठी आयोगाची मदत मागणार आहोत. राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही भेटणार आहोत असे अब्दुल्लांनी म्हटले आहे.