मातपित्याच्या अचानक मृत्यूमुळे तीन मुले झाली पोरकी : मगरीने घेतला आईचा बळी तर बापाचा हृदयविकाराने मृत्यू : शेळ्या चरावयला गेले अतसना दोघांनाही मृत्युने गाठले : सरकारसह समाजाकडून आधार मिळण्याची अपेक्षा
डिचोली / रविराज च्यारी
लाटंबार्से सावरधाट येथील पिढीजात शेळी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या बाबलो शिंगाडी (49) व संगिता शिंगाडी या पती-पत्नीचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची तीन मुले पोरकी झाली. शेळी पालन हाच त्यांच्या उपजीविकेचा व्यवसाय असल्याने आई वडिलांचे छत्र हरपलेल्या त्या मुलांना आता कसलाच आर्थिक आधार उरलेला नाही. त्यामुळे सर्वच बाबतीत परवड होत आहे. वडील बाबलो हे शेळ्यांना माळरानावर चरण्यासाठी घेऊन गेले असता हृदयविराकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले. त्यानंतर शेळींना चरायला घेऊन जाण्याचे काम त्यांची पत्नी संगीता करत होती. अशीचा शेळ्या घेऊन माळरानावर घेऊन गेली असताना तिचा धरणातील मगरीने बळी घेण्याची घटना घडली. अशा प्रकारे आई आणि वडील दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने झिंगाडी कुटुंबियांवर मोठा आघात होऊन तीन मुले मोयच्या सावलीला पोरकी झाली. उमेश शिंगाडी (वर 25), कविता शिंगाडी (वय 23) व भगवान शिंगाडी (वय 15), अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे उपजीविकेसाठी आधार नसल्याने त्याचा भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणी आधार देईल का, अशी आशा बाळगून आहेत.
दरम्यान, गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळ डिचोली तालुका समितीतर्फे अध्यक्ष दिलीप वरक यांच्या नेतृत्वाखाली या तीन भावंडांना समाजातील ठनिराधारांसाठी आधारठ या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य केले आहे. सरकार तसेच दानशूर व्यक्ती किंवा सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांच्या उपजीविकेसाठी तसेच भवितव्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे. मात्र अद्याप सरकारी तसेच सामाजिक स्थरावरून कोणत्याही प्रकारची मदत त्यांच्या पर्यंत पोहोचलेले नाही. मोठा मुलगा उमेश शिंगाडी याने बारवीपर्यंतचे शिक्षण घेऊन आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियनचा कोर्स केलेला आहे. सध्या तो करासवाडा म्हापसा येथे औद्योगिक वसाहतीत एका अस्थापनात कंत्राटी पद्धतीवर कामाला जातो. दुसरी मुलगी कविता हिने दहावीपर्यंतचे शिक्षण करून ती घरातच असते. तर तिसरा मुलगा भगवान हा सध्या पीर्ण येथील श्री शांतादुर्गा हायस्कूलमध्ये दहावीत शिकत आहे. त्यांच्या आईवडिलांनी उभारलेले छोटेसे घर आहे. परंतु, आता त्यांच्याकडे उपजीविकेसाठी सक्षम साधन नाही, त्यामुळे या मुलांसमोर भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
धरणाला कुंपण नसल्याने अपघात, पण संबंधितांकडून विचारपूसही नाही
आमठाणे धरणात घडलेल्या या घटनेनंतर जलस्रोत खात्याने या कुटुंबाची कोणतीच विचारपूसही केली नाही. तसेच कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. आमठाणे धरणात मगरींचे वास्तव्य आहे हे सर्वश्रुत आहे. यापूर्वीही या धरणात आंघोळीसाठी उतरलेल्या एका बिगरगोमंतकीय व्यक्तीला मगरीने पाण्यात ओढले होते. अशा घटना डोळ्या देखत घडल्या असताना धरण भागाला संरक्षण कुपण घालण्याचे कार्यवाही अद्याप हालचाल दिसत नाही. जर या धरणातील लोकांच्या थेट संपर्कात येणाऱ्या जागांचे संरक्षण कुंपण घालून सुरक्षित केले असते, तर हा अपघात घडलाही नसता. अशा प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. या संरक्षण कुंपणासाठी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी आमदार बनल्यानंतर लगेच लक्ष घातले होते, परंतु त्यांना खात्याअंतर्गत अधिकारी वर्गाकडून सहकार्य लाभले नाही.
सरकारने मुलांच्या भविष्यासाठी पुढाकार घ्यावा
मातापित्याचे छत्र हरपलेली तीनही मुले सध्या दु:खाने व्याकूळ होऊन घरात आहेत. भवितव्याच्या दृष्टीने कोणी मदत करेल, अशी आशा बाळगून आहेत. परंतु, आजपर्यंत त्यांची कोणी दखल घेतलेली नाही. सरकारने याची दखल घेऊन या मोठा मुलगा उमेश शिंगाडी याला सरकारी नोकरीत सामावून त्यांच्या घर संसार सावरण्यासाठी मदतीचा हात द्यावा. अन्यथा कोणत्यातरी चांगल्या खासगी कंपनीत तरी चांगली नोकरी मिळवून द्यावी, अशी आर्त हाक स्थानिक पंचसदस्य दिलीप वरक यांनी व्यक्त केली.
सामाजिक बांधिलकीतून मदतीसाठी समाजाने पुढे यावे!
शिंगाडी कुटुंबावर दुर्दैवी संकट कोसळल्यानंतर आरपीआय (कांबळे) व विश्व हिंदू परिषद या संघटनांनी पोरक्या झालेल्या मुलांची विचारपूस करून त्यांना धीर दिला आहे. या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आज समाजातील सेवाभावी लोकांनी तसेच संस्थांनी त्यांना मदत करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलाच्या शिक्षणाची कोणीतरी जबाबदारी स्वीकारावी तसेच मोठा मुलगा उमेश व मुलगी कविता यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करावे. यासाठी स्थानिक आमदार तसेच सरकारकडून मुलांना मोठ्या अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही अंत्योदय तत्वावर या मुलांना सरकारी पातळीवर आधार देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी भावना मुलांसह धनगर समाजोन्नती मंडळाकडून व्यक्त केली जात आहे.