लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतरही मस्तीत वागणारे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या पापाचा घडा भरला आहे. फक्त केंद्र सरकार ते कधी मान्य करते याची देशाला प्रतिक्षा लागली आहे. स्त्राrच्या सन्मानासाठी रावणाला यमसदनी धाडणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत महिलांच्या लैंगिक छळाचा आरोप असणारा व्यक्ती आपले शक्ती प्रदर्शन करू पाहत होता. त्यासाठी उत्तर भारतातील साधू संन्यासांना एकत्र करून पाच लाखाच्या गर्दीचा दबाव भारत सरकारवर आणण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र त्यापूर्वीच त्यांच्या कुकर्माचा पाढा इंग्रजी वृत्तपत्रांनी वाचायला सुरुवात केली. त्याच्याबद्दलच्या अनेक कहाण्यांची पुष्टी करणारे जबाब देणारे चार मान्यवर खेळाडू-प्रशिक्षक पुढे आल्याने अखेर त्याला थंडाई पाजवून गप्प बसवण्याचे काम भाजपने केले आहे. याचा अर्थ त्याची खूमखुमी कमी झाली आहे असे नाही. मात्र तरीही ऑलिंपिक पदके गंगेत विसर्जित करायला चाललेल्या खेळाडूंच्या बाजूने किमान वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. नव्या संसदेच्या उद्घाटना दिवशी पोलिसांच्या बुटाखाली त्या खेळाडूंचे मोठेपण चिरडले गेलेच आहे. पण तरीही कुठेतरी न्यायाची प्रतीक्षा देशाला करावी लागत आहे. त्यासाठी आवश्यक पुरावे जमवण्यात पोलीस मागे राहू नयेत अशी अपेक्षा आहे. कारण चौकशी समितीने इन कॅमेरा चौकशी केली तरी प्रत्यक्षात अनेकदा मध्ये कॅमेरे बंद केले गेले असा आरोप झाला आहे. त्यामुळे खेळाडूंच्या मूळ जबाबात अशी छेडछाड झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अर्थात त्यानंतर आतापर्यंत प्रकरण इतके गाजले आहे की, याप्रकरणी कोण काय भूमिका घेते हे आता लपवून ठेवणे मुश्किल होणार आहे. त्यामुळेच दिल्ली पोलिसांना या प्रकरणी 4 साक्षीदार सापडले असून त्यांनी आरोपांची पुष्टी केली आहे. यात एक ऑलिम्पियन, कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट, इंटरनॅशनल रेफ्री आणि राज्यस्तरीय प्रशिक्षकाचा समावेश आहे ही माहिती ही दडून राहिली नाही. यातील एका महिला कुस्तीपटूच्या प्रशिक्षकाने दिल्ली पोलिसांच्या एसआयटीला त्याच्या कारनाम्याबद्दल 6 तासांनी पीडितने ही गोष्ट फोनवरून मला सांगितल्याचे तर आंतरराष्ट्रीय रेफ्रींनी, ते टूर्नामेंटसाठी भारतात किंवा परदेशात जायचे तेव्हा महिला कुस्तीपटूंकडून आपण ही समस्या ऐकल्याचे मान्य केल्याचे लपवून ठेवता आलेले नाही. उत्तर भारतातील माध्यमांचा या प्रकरणातील नकारात्मक भाव उघड पडल्यानंतर समाज माध्यमे आणि इंग्रजी वृत्तपत्रांनी थेट याप्रकरणात दाखल असलेल्या फिर्यादीच छापून आरोप किती गंभीर स्वरूपाचे आहेत याची कल्पना समाजाला देऊ केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात केंद्र सरकारला पूर्वीप्रमाणे गप्प राहता येणार नाही. केवळ चौकशी सुरू आहे असे म्हणून अंग काढूनही घेता येणार नाही आणि भारतातील नामवंत खेळाडू, ऑलम्पिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बोटचेपी भूमिका घेऊन गप्पही बसता येणार नाही. आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेने आणि ऑलिंपिक संघटनेने याबाबत जारी केलेली पत्रके भारतीय संघटनेचा एक प्रकारे धिक्कार करणारी आहेत. एखाद्या प्रकरणात किती लेचे-पेचे राहावे? असा सवालच त्यांनी भारतातील नामवंत क्रीडापटूंना करून त्यांच्या विवेकाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंनीही एकत्रितरित्या खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. इतके असूनसुद्धा केंद्र सरकार अद्याप बृजभूषणला अटक करावी अशी भूमिका घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे खेळाडूसुद्धा नमते घ्यायला तयार नाहीत. आता असे समजते आहे की, केंद्र कुस्तीपटूंच्या पाच मागण्या मान्य करण्यास तयार आहे. त्यात लखनऊ ते पटियालापर्यंत महिला कुस्ती शिबिर, आरोपी प्रशिक्षकाची हकालपट्टी, डब्ल्यूएफआयचे निलंबन, कुस्तीपटूंवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणे व महिला कुस्तीची सूत्रे महिलेकडे सोपवण्याचा समावेश आहे. पण बृजभूषण याची अटक व फेडरेशनमधून संपूर्ण हकालपट्टीची अट सरकारला मान्य नाही. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी सरकारने कुस्तीपटूंपुढे आंदोलन मागे घेण्याची पूर्वअट ठेवली आहे. क्रीडामंत्र्यासह चार केंद्रीय मंत्री साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्याशी बोलायला तयार आहेत. पण, अटक न करता न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची त्यांची अट आहे. केंद्र सरकारने खेळाडूंवर असा दबाव वाढवल्यानंतर शुक्रवारी कुरुक्षेत्र येथे झालेल्या महापंचायतीत खाप प्रतिनिधींनी केंद्र सरकारला बृजभूषण याला अटक करण्यासाठी 9 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर 11 जून रोजी ते स्वत: कुस्तीपटूंना दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलनासाठी नेऊन सोडणार आहेत. तेथे सरकारला या आंदोलकांना अटक करायची असेल तर नक्की करावी. आम्ही त्याच्यासाठी मुलांना मैदानावर आणण्यास तयार आहोत. यापुढे सरकारने अटकेची भीती घालू नये, खेळाडूंनी स्वत:ला अटक करून घेण्याची तयारी दर्शवली आहे पण सरकार बृजभूषणला इतके सारे वाईट कृत्य घडूनसुद्धा का अटक करत नाही? असा सवाल राकेश टिकेत यांनी सरकारला केला आहे. बृजभूषण विरोधात उजेडात आलेल्या दोन पैकी एक एफआयआरमध्ये, अल्पवयीन कुस्तीपटूने आरोप केला आहे की, बृजभूषणने फोटो काढण्याच्या नावाखाली जबरदस्तीने तिला आपल्याकडे खेचले. मी तुला सपोर्ट करेन, तू मला कर, असे ते म्हणाले. त्यानंतर तिला खोलीत बोलावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यामुळे तिचा छळ सुरू केला. दुसऱ्या एफआयआरमध्ये 6 प्रौढ कुस्तीपटूंनी तक्रार दाखल केली. त्यात बृजभूषणवर जबरदस्तीने पकडण्याचा आरोप करण्यात आला आहे. श्वास तपासणीच्या नावाखाली टी-शर्ट काढायला लावणे, अयोग्य स्पर्श, जखमी खेळाडूचा खर्च असोसिएशनने उचलण्यासाठी शारिरीक संबंधांची मागणी, नकार देणारीच्या चाचणीमध्ये भेदभाव केला हे आता केवळ आरोप राहिले नाहीत त्याला पुष्टी देणारे साक्षीदार पुढे आले आहेत. ते सुध्दा मान्यवर खेळाडू होते हे लक्षात घेतले तर बृजभूषणचा घडा भरलाय. फक्त तो केंद्र सरकारने मान्य करणे तेवढे राहिले आहे हेच दिसून येत आहे.