/मराठी भाषिक नेत्यांचा इशारा
प्रतिनिधी /निपाणी
सीमालढय़ासाठी मराठी भाषिकांच्या अनेक पिढय़ा खपल्या. भाषावार प्रांतरचनेनंतर गेल्या 65 वर्षांत सीमाभागातील मराठी माणसाएवढी घुसमट कोणाची झाली नाही. मात्र आता मराठी भाषिकांनी विशेषतः तरुणपिढीने निर्णायक लढय़ाची तयारी ठेवावी. प्रशासनाने काळादिन साजरा होऊ नये यासाठी यंदा मोठी दडपशाही अवलंबली. प्रसंगी जेलमध्ये टाकण्याच्या धमक्मया देण्यात आल्या. मात्र असल्या धमक्मयांना भीक घालणार नाही, असा इशारा निपाणीत मराठी भाषिक नेत्यांनी दिला.
येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात मराठी भाषिकांची बैठक पार पडली. यावेळी बोलताना प्रा. डॉ. अच्युत माने म्हणाले, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी बेळगावात परवानगी मिळते. मग निपाणीत का नाही? याचा येथील मराठी भाषिकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आता रस्त्यावरची लढाई महत्त्वाची असून त्यासाठी मराठी भाषिकांनी तयारी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवसेना चिकोडी प्रमुख बाबासाहेब खांबे, म. ए. समितीचे जयराम मिरजकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण, प्रा. एन. आय. खोत, प्रा. भारत पाटील, माजी सभापती विश्वास पाटील, माजी नगरसेवक नंदकुमार कांबळे, लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह मराठी भाषिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.