प्रतिनिधी / जळगाव :
आज शिवसेनेची स्थिती पाहता दु:ख होते. शिवसेनेवर ही वेळ यायला नको होती. एकमेकांना दोष देण्यात अर्थ नाही. आहे ती वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, यात उद्धव ठाकरे यांच्या देखील काही चुका झाल्या असतील. आता शिवसेना कमकुवत झाल्याने राज्यात भाजपाला मजबूत होण्यासाठी मोठी संधी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. खडसे म्हणाले, पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडून काही चुका झाल्या असतील, पण चूक एवढी मोठी नसावी की, ज्यामुळे संपूर्ण पक्ष संपून जाईल. न्यायालयाच्या निर्णयाकडे आपण आशेने पहात आहोत पण न्यायालय देखील काही वेगळा निर्णय देईल, असे वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी मोठया मेहनतीने शिवसेना राज्यात उभी केली होती. त्यांच्याच मेहनतीने धनुष्यबाणाला एक वेगळी प्रतिष्ठा संपूर्ण महाराष्ट्रात प्राप्त झाली. आता दोघांच्या भांडणामुळे दोन तुकडे होऊन सेना दुभंगली. हे राज्याच्या हिताच्या दृष्टीने चांगले झाले नाही.
अधिक वाचा : ‘सेट’ची तारीख लवकरच जाहीर होणार
पक्षात वाद असतात, मतभेद असतात पण विकासासाठी एकत्र येऊन भूमिका घेतली पाहिजे. सध्या मात्र व्यक्तिगत शत्रुत्वाचे राजकारण सुरू आहे, अशा रितीने भांडत राहिल्याचा परिणाम हा राज्याच्या विकासावर होत आहे. यात विकास मागे पडत आहे. दोघांच्या भांडणात चिन्ह गमवावे लागले. शिवसेना कमजोर होत असताना भाजपाला मात्र पक्षवाढीसाठी मोठी संधी असल्याचे मत त्यांनी नोंदवले.