शाहूवाडी/प्रतिनिधी
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील निळे गावच्या हद्दीत रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने गाडीवरून पडून दिलशाद अहमदसाहब देवळेकर (वय 38 रा. वालूर ता. शाहूवाडी) ही महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वालूर ता. शाहूवाडी येथील आदममिया महंमद ताम्हणकर हे आपली मुलगी दिलशाद अहमदसाब देवळेकर हिला घेऊन मलकापूरकडून वालूर या आपल्या गावी दुचाकीवरून निघाले होते. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील निळे गावच्या हाद्दीत रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यात पावसाने पाणी साचले आहे. खड्डा न दिसल्याने गाडी मध्यभागी असणाऱ्या खड्ड्यात गेल्याने गाडीवरील दिलशाद या डोक्यावर पडल्या त्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
खड्ड्याने घेतला बळी
गेले अनेक दिवस हा खड्डा असाच आहे. हा अनेक वेळा अपघाताला निमंत्रण ठरत होता. अखेर त्या खड्ड्यामुळे एक महिला आपल्या जीवाला मुकावे लागल्याने नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मार्गावरून अनेक वाहनांची वर्दळ असते. मात्र या मार्गावर पडलेल्या खड्याकडे दुर्लक्ष झाल्याने अपघात झाल्याची प्रतिक्रिया बागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.
तर आपल्या समोर मुलीचा झालेला मृत्यू पाहून वडील आदम मिया ताम्हणकर यांना चांगलाच धक्का बसला होता. यावेळी त्यांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. तर मृत झालेल्या दिलशाद देवळेकर यांच्या पश्चात पती, तीन मुले असा परिवार आहे