पन्हाळा अभ्यासाचे अनेक पैलु आजही दडलेले.
सुधाकर काशीद,कोल्हापूर
World Architecture Day Special : पन्हाळा म्हणजे केवळ तीन दरवाजा,पुसाटी बुरुज,सज्जा कोटी नव्हे तर, पाचव्या सहाव्या शतकाच्या पूर्वीपासून पन्हाळा हे मानवी अस्तित्वाचे महत्त्वाचे केंद्र होते व त्याचे पुरावे आजही या परिसरात आहेत.त्यामुळे पन्हाळा हा प्राचीन इतिहास, त्या काळातील राहणीमान, संस्कृती, त्या त्या काळातील बांधकामे याचा अस्सल पुरावा आहे.आर्किटेक्चर अंगाने तर पन्हाळा हा त्या वैविध्यांना मोठ्या उंचीवर नेऊन पोहचवणारा गड आहे. असे पुरातत्व शास्त्र अभ्यासक सचिन पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
आज गुरुवारी जागतिक आर्किटेक्चर दिन आहे.त्यानिमित्ताने पन्हाळ्यातील मानवी वस्तीच्या पाऊल खुणा किती मोलाच्या आहेत हे त्यांनी विषद केले.आज तर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्ट कोल्हापूर सेंटरच्या वतीने पन्हाळ्याचे संवर्धन या विषयावर ते पन्हाळ्याचा दोन हजार वर्षापासूनचे मानवी अस्तित्व व पन्हाळ्याच्या बांधणीचे वेगवेगळे टप्पे आपल्या व्याख्यानातून मांडणार आहेत.
पन्हाळा खूप वेगळा म्हणूनच…
ते म्हणाले,आता पन्हाळा केवळ पर्यटनाचे एक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.पर्यटन वाढते हे चांगलेही आहे. पण ज्या पन्हाळ्यावर आपण पर्यटनासाठी आलोय त्या पन्हाळ्याचा इतिहास, पन्हाळ्यावरील बांधकामाचे वेगवेगळे पैलू हे पर्यटकांना किंवा आपल्या नव्या पिढीला माहित असणे गरजेचे आहे. तीन दरवाजा, सज्जा कोटी हे इतिहास कालखंडाच्या तुलनेत अलीकडच्या वास्तु आहेत.पण केवळ काही दृश्य स्वरूपात दिसणाऱ्या वास्तू म्हणजेच पन्हाळा अशी लोकांची समजूत आहे. पण त्याहीपेक्षा पन्हाळा खूप वेगळा आहे.
अकराव्या शतकातील लिखित पुरावे
अकराव्या शतकाच्या सुरुवातीला मिरज येथे एक ताम्रपट मिळाला आहे.शिलाहार राजा मारसींह राज्याच्या राजवटीतला तो ताम्रपट आहे.त्यावेळी त्याची राजधानी कराड होती.व त्याच्या क्षेत्रात पन्हाळगड हा उंच किल्ला (खिलगिली)असा उल्लेख आहे. 1191 च्या एका ताम्रपटात पद्मनाळ दुर्ग असा उल्लेख आहे.म्हणजे हे पन्हाळ्याच्या अस्तित्वाचे अकराव्या शतकातील लिखित पुरावे आहेत.
शिलाहार राजा भोज याच्या काळात पन्हाळ्याची बांधणी झाली
पन्हाळ्याच्या दोन्ही बाजूस बुद्धकालीन गुफा आहेत.बहामनीच्याही गुफा आहेत या गुफा म्हणजे मानवी अस्तित्वाच्याच खुणा आहेत.याशिवाय कदंब,चालुक्य, राष्ट्रकुल, शिलाहार, भोज, आदिलशाही, मराठेशाही अशा भिन्न राजवटीच्या अस्तित्वाचा इतिहास पन्हाळ्याला आहे.आपण साधारणपणे शिलाहार राजा भोज याच्या काळात पन्हाळ्याची बांधणी झाली असे मानतो.पण त्याआधी पासून पन्हाळा आहे. तो कालानुरूप त्या त्या राजवटीत, त्या त्या परिस्थितीत बदलत गेला आहे.
शिवाजी महाराज पहिल्यांदा पन्हाळा गडावर आले
भोज राजाच्या काळात तटबंदी दगडी दरवाजे झाले.इस्लामिक राजवटीत मोहम्मद गवा नने धान्याचे कोठार बांधले.पन्हाळ्यावर पाण्याची नैसर्गिक मुबलकता असल्याने साडे सोळाशे एकराच्या या पठारावर वस्ती होती. किंबहुना पन्हाळा हा त्या त्या राजवटीत वॉच टॉवर म्हणून महत्त्वाचे काम करत होता.28 नोव्हेंबर 1659 साली छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा पन्हाळा गडावर आले व त्यांनी त्याच रात्रीत मशालीच्या उजेडात हा गड व त्यावरील साऱ्या वास्तू पाहिल्या.त्यानंतर शिवरायांच्या कारकिर्दीत पन्हाळगडाने खूप मोठा पराक्रमी इतिहास अनुभवला.
पन्हाळ्याच्या वैभवावर आणखी एक मोठा शिरपेच लागणार
पन्हाळ्याची नैसर्गिक रचना वेगळी आहे.बांधकामाची शैली वेगवेगळी आहे.आणि ती वैविध्ये अभ्यासण्या योग्य अशी आहेत.त्यामुळे पुरातत्वीय दृष्टय़ा म्हणजे केवळ वास्तुरूपाने नव्हे तर,पन्हाळ्याचा अशा सर्व अंगाने अभ्यास झाला तर,पन्हाळ्याच्या वैभवावर आणखी एक मोठा शिरपेच लागणार आहे.आणि ते काम आमच्याकडून सुरू आहे.