पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या षटकात दणकेबाज विजय मिळवून दिल्यानंतर हार्दिक पंडय़ाची प्रतिक्रिया
दुबई / वृत्तसंस्था
पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक स्पर्धेतील साखळी सामन्यात दणकेबाज विजय संपादन करुन देणाऱया हार्दिक पंडय़ाने शेवटच्या षटकात 7 नव्हे तर 15 धावांचे आव्हान असते तर तेही पार करुन दिले असते, अशा शब्दात आपला दुर्दम्य आत्मविश्वास व्यक्त केला. पंडय़ासाठी पाकिस्तानविरुद्धचा सामना अविस्मरणीय ठरला. त्याने प्रारंभी 4 षटकात 25 धावात 3 बळी घेतले व नंतर अवघ्या 17 चेंडूत नाबाद 33 धावांची आतषबाजी केली. यात मोहम्मद नवाझला विजयी षटकारही त्यानेच फटकावला. या विजयश्रीनंतर तो माध्यमांशी बोलत होता.
‘अशा बडय़ा सामन्यात धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक षटकाचे गणित समोर ठेवत असतो. शेवटच्या टप्प्यात पाकिस्तानने एक नवखा गोलंदाज (नसीम किंवा शाहनवाज दहानी) आणि एका डावखुऱया ऑफस्पिनरला (नवाझ) किमान एक षटक देणे भाग असेल, याची मला पूर्ण कल्पना होती आणि त्या दृष्टीनेच मी रणनीती आखली. 20 व्या षटकात माझ्यापेक्षा प्रतिस्पर्धी गोलंदाजावर दडपण आहे, याची मला कल्पना होती आणि याचाच मी लाभ घेण्यात यशस्वी ठरलो’, असे पंडय़ा याप्रसंगी म्हणाला.
हार्ड लेंग्थवर भर देत उसळते चेंडू टाकणे हे माझे बलस्थान आहे आणि रविवारच्या सामन्यात मी त्यावर लक्ष केंद्रित करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना चुका करणे भाग पाडले, याचाही त्याने उल्लेख केला.
रोहित शर्माची पंडय़ावर स्तुतिसुमने
हार्दिक पंडय़ा क्रीझवर आहे, तोवर सामना आपल्याच खिशात आहे, याची पूर्ण कल्पना असलेल्या भारतीय कर्णधार रोहित शर्माने या दिग्गज खेळाडूची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर हार्दिक पंडय़ाच्या खेळात बरीच प्रगल्भता आली आहे. संघाबाहेर असताना त्याने आपण फिटनेससाठी काय करणे आवश्यक आहे, स्टॅमिनासाठी काय आवश्यक आहे, याचा पुरेपूर विचार केला आणि त्यामुळेच तो आता प्रतितास 140 किमी वेगाने गोलंदाजी करण्यात यशस्वी ठरला आहे. आपण बारीक निरीक्षण केले तर लक्षात येईल की, त्याचा आता संयमावर अधिक भर असतो. तो परिस्थिती वाचण्यावर लक्ष केंद्रित करत आला आहे. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, आपली जबाबदारी चोख पार पाडण्यावर त्याचा पूर्ण भर असतो’, असे रोहित याप्रसंगी म्हणाला.
कोट्स
फलंदाजीत आम्हाला 10-15 धावा आणखी करता आल्या असत्या. या 10-15 धावाच आम्हाला कमी पडल्या. केवळ 148 धावांच्या आव्हानाचे संरक्षण करत असताना यानंतरही आमच्या गोलंदाजांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद होते. विजय मिळवता आला नसला तरी विशेषतः युवा खेळाडूंचे योगदान दखलपात्र आहे.
-पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम
प्रचंड दडपणातही आपल्या जलद गोलंदाजांनी टिच्चून केलेला मारा या सामन्यात निर्णायक ठरला. हार्दिक पंडय़ाला रविंद्र जडेजा व विराट कोहली यांची लाभलेली साथ तितकीच महत्त्वाची होती. या रोमांचक विजयाबद्दल भारतीय संघाचे खास अभिनंदन.
–माजी कर्णधार सचिन तेंडुलकर
फॅन्टास्टिक हार्दिक पंडय़ा! सब कुछ मै करेगा! भुवनेश्वर, जडेजा व कोहलीचे देखील खास अभिनंदन. भारत-पाकिस्तान सामना खूप दिवसानंतर झाला. मस्त मजा आ गया!
-माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग
प्रचंड दडपणाखाली असतानाही मिळवलेला खास विजय! टीम इंडियाचे खास अभिनंदन. हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजा, भुवनेश्वरचे विशेष कौतुक.
-माजी डावखुरा फलंदाज युवराज सिंग
हार के बाद जीत आए उसका मजा हमेशा दुगना होता है! इंडिया, इंडिया!
-माजी डावखुरा गोलंदाज इरफान पठाण
आजचा सामना कमकुवत हृदयवाल्यांसाठी अजिबात नव्हता! क्षणाक्षणाला विजयाचे पारडे इकडून तिकडे होत असताना दडपण दोन्ही संघांवर होते. भारताला त्यातून आपला नैसर्गिक खेळ साकारता आला.
–भारतीय सलामीवीर मयांक अगरवाल
टी-20 सामन्यात सर्वही 10 बळी भारतीय पेसर्सनी घेण्याची पहिलीच वेळ!
एखाद्या टी-20 सामन्यात भारतीय जलद गोलंदाजांनी सर्वच्या सर्व 10 बळी घेण्याची पाकिस्तानविरुद्ध पहिलीच वेळ होती. पूर्ण सामन्यात भारतीय जलद गोलंदाज पाकिस्तानी फलंदाजांवर सातत्याने तुटून पडत राहिले.
भुवनेश्वर कुमारने 26 धावात 4 बळी घेतले आणि बाबर आझमसारखा मोठा मासा त्याच्याच जाळय़ात अडकला. पॉवर प्लेमध्ये बाबर आझमला 9 चेंडूत 10 धावांवर समाधान मानावे लागले, यावरुन त्याची प्रचिती आली. शदाब खान (10), असिफ अली (9) व नसीम शाह (0) यांनाही भुवनेश्वरने तंबूचा रस्ता दाखवला.
याशिवाय, हार्दिक पंडय़ाने 25 धावात 3 बळी घेताना इफ्तिकार अहमद, रिझवान, खुशदिल यांना तंबूचा रस्ता दाखवला. अवेश खानने फखर झमानला यष्टीमागे झेल देणे भाग पाडले. याशिवाय, डावखुरा जलद गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या पहिल्याच लढतीत 3.5 षटकात 33 धावात 2 बळी घेतले. त्याने मोहम्मद नवाझ (1) व दहानी (16) यांना बाद केले.
साना मिरकडून फखर झमानची प्रशंसा
स्टेडियममध्ये प्रचंड गदारोळातही आपण बाद आहे, याची कल्पना असल्याने आघाडीचा पाकिस्तानी फलंदाज फखर झमानने पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता तंबूचा रस्ता धरत खिलाडूवृत्ती दाखवली. या खिलाडूवृत्तीचे पाकिस्तान महिला संघाची माजी कर्णधार साना मिर हिने कौतुक केले. फखर झमान हा अवेशच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र, आश्चर्य म्हणजे त्यावेळी अवेशने, तसेच अन्य कोणीही भारतीय क्षेत्ररक्षकांनी तो बाद असल्याचे साधे अपीलही केले नव्हते.
पायात वेदनांचे कडे आणि तरीही नसीम शेवटपर्यंत झुंजला!
आशिया चषक स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी अब्दुल कादिरचा मुलगा सुलेमान कादिरने नसीम शाहला आवर्जून सांगितले होते, ‘अब आपकी जिंदगी की उडान शुरु हुई है! परफॉर्म किया तो आप भी शाहिन की तरह सुपरस्टार बनोगे’! आणि आशिया चषकातील पहिल्याच लढतीत नसीमने आपला प्रवास सुपरस्टार बनण्याच्या दिशेने आहे, हेच जणू दाखवून दिले!
नसीमने प्रारंभी केएल राहुलला चुकीचा फटका खेळणे भाग पाडत त्रिफळा तर उडवलाच. शिवाय, नंतर विराट कोहलीला देखील बाहेरचा चेंडू खेळण्याच्या मोहात पाडत जवळपास बाद केलेच होते. विराटचे सुदैव की स्लीपमधील क्षेत्ररक्षक यात यशस्वी ठरला नाही. नंतर नसीमने रोहित, सूर्यकुमार यादवला देखील अफलातून चेंडू टाकले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डावाच्या उत्तरार्धात पायात गोळे आल्याने प्रचंड वेदना होत असताना देखील त्याने शेवटपर्यंत झुंजत षटक पूर्ण केले. शेवटचे दोन-तीन चेंडू टाकत असताना तर तो प्रचंड कळवळत होता. पण, तरीही त्याने जिद्द सोडली नाही. अगदी प्रतिकूल स्थितीतही त्याने षटक पूर्ण केले. या सामन्यात त्याचे गोलंदाजी पृथक्करण 4 षटकात 27 धावात 2 बळी असे राहिले.
सात वर्षांपूर्वी नसीमने माजी जलद गोलंदाज अँडी रॉबर्ट्सकडून जलद गोलंदाजीचे काही धडे गिरवले. त्याचेच प्रतिबिंब जणू नसीमच्या गोलंदाजीतून आता उमटते आहे.
…अन् ‘अंडररेटेड’ भुवनेश्वरने प्रतिस्पर्ध्यांना त्यांची जागा दाखवली!
एरवी भारताविरुद्ध सामन्यात बुमराह व शमीसारख्या तेजतर्रार मारा करणाऱया गोलंदाजांना सामोरे जाण्याची सवय असलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना भुवनेश्वरला सामोरे जाणे ‘केकवॉक’ असेल, असेच कदाचित भासत होते. अगदी बाबर आझम देखील त्याला अपवाद नव्हता. पण, हीच चूक त्यांना अपयशाच्या खाईत लोटणारी ठरली. जागतिक क्रिकेटमध्ये नेहमीच ‘अंडररेटेड’ ठरत आलेल्या भुवनेश्वरने चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करत कधी बेमालूम गेम केला, हे पाकिस्तानी फलंदाजांना कळाले देखील नाही! बाबर आझम भुवनेश्वरच्या उसळत्या चेंडूला फटकावण्याच्या मोहात फसला आणि शॉर्ट फाईन लेगवर अर्शदीपने झेल टिपला.
वास्तविक, बुमराह, शमी नसताना भारतीय वेगवान गोलंदाजांची कामगिरी कशी होईल, याबद्दल प्रत्यक्ष सामन्यापूर्वी साशंकता व्यक्त होत होती. पण, शमीचा तेजतर्रार मारा किंवा बुमराहचे भेदक यॉर्कर्स नसतानाही भुवनेश्वर नावाच्या स्विंग सम्राटाने पाकिस्तानी फलंदाजी लाईनअपला चांगलेच भगदाड पाडले.
भुवनेश्वर यॉर्कर, बाऊन्सर, कटर, स्लोअर वन, नकल बॉल, स्विंग आणि सीम अशा सर्व प्रकारे फलंदाजांना बुचकळय़ात टाकू शकतो. पण, कधी सातत्याने होणाऱया दुखापतींमुळे तर कधी कसोटी क्रिकेटमधील अपयशाने त्याची प्रतिमा पार झाकोळली होती. आता मात्र हा स्विंग सम्राट उत्तम बहरात परतला आहे आणि त्याची नजाकतदार स्विंग-सीम गोलंदाजी भारतीय संघासाठी बलस्थान ठरत राहणार आहे!
तसे झाल्यास यापुढील दोन्ही रविवारी पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने!
सध्या भारत-पाकिस्तानचे संघ द्विदेशीय मालिका खेळत नसल्याने उभयतातील सामन्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल, इथवर पोहोचली आहे. पण, यंदा आशिया चषकाच्या निमित्ताने चाहत्यांना खऱया अर्थाने मेजवानी लाभत आहे. रविवारी साखळी सामन्यात भारताने ब्लॉकबस्टर विजय मिळवत विश्वास सार्थ ठरवला. अर्थात, स्पर्धेची रुपरेषा पाहता भारत-पाकिस्तान यांच्यात आणखी दोन सामने होण्याची शक्यता असून आश्चर्य म्हणजे या दोन लढती देखील रविवारीच होऊ शकतात.
स्पर्धेतील रुपरेषेनुसार, सुपर-4 फेरीत ए1-ए2 या दोन संघात रविवार दि. 4 सप्टेंबर रोजी लढत होत असून भारत-पाकिस्तान यांनी या गटातून पात्रता मिळवल्यास ते सलग दुसऱया रविवारी आमनेसामने भिडतील. त्यानंतर रविवार दि. 11 रोजी स्पर्धेची फायनल होत असून अन्य संघांचा सध्याचा फॉर्म लक्षात घेता तेथेही भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने भिडू शकतात.
आशिया चषक स्पर्धेतील गुणतालिका
अ गट
संघ / सामने / विजय / पराभव / गुण / धावसरासरी
भारत / 1 / 1 / 0 / 2 / 0.175
पाकिस्तान / 1 / 0 / 1 / 0 / -0.175
हाँगकाँग / – – – –
ब गट
संघ / सामने / विजय / पराभव / गुण / धावसरासरी
अफगाण / 1 / 1 / 0 / 2 / 5.176
श्रीलंका / 1 / 0 / 1 / 0 / -5.176
बांगलादेश / – – – –