रस्त्यावरील खड्डय़ांमुळे वाहनचालक त्रस्त
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर गावापासून अवचारहट्टीपर्यंतचा अंदाजे एक ते दीड कि. मी. चा रस्ता चिखलमय झाला आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्य़ांमध्ये पाणी साचले असून, रात्रीच्यावेळी वाहनचालकांना निदर्शनास न आल्याने अपघात होत आहेत. रस्ता पूर्णपणे खचला असून त्यामध्ये खडी व इतर साहित्य टाकण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे.
अरवाळी धरणाचे ओव्हरफ्लो होणारे पाणी यापूर्वी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे बऱयाचवेळा येळ्ळूर-अवचारहट्टी रस्ता पाण्याखाली जात होता. ही समस्या सोडविण्यासाठी ब्रिज बांधला जात आहे. परंतु हे काम मे अखेरनंतर सुरू झाल्यामुळे मुख्य रस्ता बंद असून, बाजुने तात्पुरत्या स्वरूपात रस्ता करण्यात आला आहे. हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून दुचाकी व चारचाकी वाहने येणे-जाणेही कठिण झाले आहे. चिखलामध्ये वाहने अडकून व घसरून अपघात होत आहेत.
हलगा-मच्छे बायपाससाठी अरवाळी धरणावरून माती नेली जात होती. अवजड ट्रकमुळे येळ्ळूर-अवचारहट्टी रस्ता खचला आहे. खचलेल्या रस्त्यात आता पाणी भरत असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अवचारहट्टी-यरमाळची बसदेखील अनेकवेळा येळ्ळूर येथूनच माघारी परतत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत येळ्ळूर गाठावे लागत आहे. त्यामुळे रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात का होईना, परंतु डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.