मराठा आरक्षणाबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी संवेदनशील रहावे
प्रतिनिधी/ सातारा
मागच्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. ते उच्च न्यायालयात टिकले होते. ते आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या काळात रद्द झाले. पुन्हा देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आल्याने मराठा समाजाच्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. माझ्या मराठा बांधवांना एवढेच सांगायचे आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून गेलेले आरक्षण परत मिळेल, असा दावा आमदार शिवेंद्रराजे यांनी केला.
सुरुची निवासस्थानी पत्रकारांनी जावून त्यांना मंत्री तानाजी सावंत यांच्याबाबत छेडले असता ते म्हणाले, मी जे वाचले किंवा ऐकले त्यावरुन माझे मत असे आहे की सगळय़ाच लोकप्रतिनिधींनी लोकांच्या भावनांचा विचार करावा. राज्यातून मराठा आरक्षणाच्या बाबतीत लोकांच्या मागण्या असतील त्याकडे संवेदनशीलपणे बघितले पाहिजे. एखाद्या वेळेस मागण्यांची पद्धत वेगळी असेल, प्रक्षोभक असेल तर लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. आता मराठा आरक्षणाचा विषय चालला आहे. मराठा समाजाची युवा पिढी आहे. त्यांच्या भावना काय आहेत. त्या समजून घेवून बोलले पाहिजे. त्यावर रिअक्ट होणे चुकीचे आहे. मराठा समाजाच्या अपेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेत आल्यानंतर वाढणे हे साहजिक आहे. यापूर्वी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. ही वस्तूस्थिती आहे. त्यांनी ते हायकोर्टात टिकवले ती दुसरी वस्तूस्थिती आहे. आता मराठा समाजाला मिळालेले आरक्षण महाविकास आघाडीच्या काळात रद्द केले. न्यायालयात कायदेशीर बाजू मांडल्या गेल्या नाहीत. आयोग करायला पाहिजे ते केले गेले नाहीत. त्यामुळे मिळालेले आरक्षण गेले. आता ते कोर्टात प्रलंबीत आहे. फडणवीस साहेब परत सत्तेत आलेत त्यामुळे मराठा समाजाच्या अपेक्षा त्यांच्याकडून जास्त आहेत. एकनाथ शिंदे साहेब स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यांना पण मराठा समाजाची सध्याची परिस्थिती माहिती आहे. माझ्या मराठा बांधवांना एवढेच सांगायचे आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून गेलेले आरक्षण परत मिळेल. परवा सुद्धा सह्याद्री गेस्ट हाऊसवर बैठक झाली. बरेच निर्णय त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी घेतले. अण्णासाहेब पाटील महामंडळाचा निर्णय घेतला. आरक्षणाच्या बाबतीत उपसमिती नेमली आहे. जी पाऊले टाकण्याचे काम युती सरकारच्या माध्यमातून सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून चांगली गोड बातमी मिळेल, अशी मला खात्री आहे, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, पाकिस्थान जिंदाबादच्या घोषणेवरुन हा अतिशय चुकीचा प्रकार आहे. भारतात राहून पाकिस्थानच्या घोषणा दिल्या जातात. जेथून अतिरेकी कारवाया केल्या जातात. अशा समाजकंटकावर कठोर कार्यवाही व्हावी, जे एक उदाहरण बनल पाहिजे. म्हणजे असे पुन्हा उदातिकरण झाले नाही पाहिजे. त्याकरता कोणत्याही पक्षांनी त्यांनी पाठीशी घालू नये, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक
मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, तानाजी सावंत यांनी उघडपणाने माफी मागितली आहे. त्यांच्याकडून अनावधनाने वक्तव्य गेले आहे. तो विषय तेथेच संपला पाहिजे, असे सांगत, त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक विचाराधिन आहे. त्या अनुषंगाने समिती स्थापन करण्यात आली आहे. तिची बैठक पार पडली. तास दीड तास सकारात्मक सकारात्मक चर्चा झाली. अधिवेशन संपल्यावर यावर आणखी चर्चा होईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.