प्रतिनिधी / बेळगाव
अंगणवाडी कर्मचाऱयांच्या वेतनामध्ये 30 टक्के कपात करण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचाऱयांनी कोरोना काळात रात्रंदिवस काम केले आहे. मात्र कोणत्याच सुविधा या कर्मचाऱयांना देण्यात आल्या नाहीत. रेशन देताना गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामध्ये सुधारणा करून आमच्या वेतनात वाढ करावी तसेच इतर सुविधा लागू कराव्यात या मागणीसाठी ‘सिटू’तर्फे मोर्चा काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांचे वेतन कमी करण्यात आले आहे. त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. गेल्या वर्षभरामध्ये एकूण 24 कोटी 52 लाख 38 हजार रुपये वेतनकपात करण्यात आली आहे. ही अन्यायकारक बाब आहे. त्यामुळे ही सर्व रक्कम सरकारने आता अंगणवाडी कर्मचाऱयांना द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
रेशन देताना अंडीही त्याचवेळी द्यावीत. सध्या एकदा रेशन व नंतर अंडी दिली जात आहेत. मात्र, त्यामध्ये गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे एकाचवेळी या दोन्ही वस्तू द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. निवृत्त झालेल्या कर्मचाऱयांना शिक्षिकांना 50 हजार रु. तर मदतनीसना 30 हजार रु. द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र अजूनही ती रक्कम देण्यात आली नाही. या कर्मचाऱयांना आरोग्य कवच योजना सुरू करावी. अंगणवाडीलाच एलकेजी, युकेजी जोडाव्यात. कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱयांना 30 लाख रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, कोणालाही हा निधी देण्यात आला नाही, असा उल्लेखही निवेदनामध्ये करण्यात आला आहे.
यावेळी मंदा नेवगी, मिनाक्षी दाफाडे, एस. जी. कुलकर्णी. के. जी. टोपीनकट्टी, पी. एम. पाटील, जी. एम. कंग्राळकर, ए. व्ही. पाटील, एम. एन. कदम यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.