वृत्तसंस्था/ ढाका
रविवारी येथे झालेल्या अंधांच्या तिरंगी क्रिकेट मालिकेतील अंतिम सामन्यात पाकने भारताचा 62 धावानी पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. या सामन्यात पाकने फलंदाजी आणि गोलंदाजीत दर्जेदार कामगिरी करत 2021 च्या अंधांच्या तिरंगी क्रिकेट मालिकेचे जेतेपद मिळविले.
या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकने 15 षटकांत 3 बाद 174 धावा जमविल्या त्यानंतर भारताने 15 षटकांत 7 बाद 112 धावापर्यंत मजल मारली.
पाकच्या डावामध्ये कर्णधार निसार अलीने नाबाद 69, झफर इक्बालने 48 धावा झळकविल्या. भारतातर्फे अजयकुमार रेड्डीने 26 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर भारताच्या डावात सुनील रमेशने 39, पंकज भुईने 23 धावा केल्या. पाकच्या साजिद नवाजने 28 धावांत 2 गडी बाद केले.