वार्ताहर/ राजापूर
केसीसी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे महामार्गावरील वाटूळ येथील ओझर-तिवरे तिठा धोकादायक बनल्याचे वृत्त ‘तरूण भारत’मध्ये प्रसिध्द होताच ठेकेदार कंपनीने तत्काळ या तिठय़ावर सुरक्षादर्शक बसवले आहेत. मात्र पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था अद्यापही करण्यात आली नसून ती तातडीने करण्याची मागणी होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱया ठेकेदार कंपनीच्या मनमानीमुळे ओझर-तिवरे तिठा येथील एका घराला त्रास सहन करावा लागत होता. या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी सरळ या घरामध्ये शिरत होते. पाण्यासोबत मातीही वाहून आल्याने तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय येथे रस्त्याला संरक्षक कठडाही नसल्याने अपघात होण्याची शक्यता होती. या बाबत ‘तरूण भारत’मध्ये प्रसिध्द बातमीची दखल घेत कंपनीने तिवरे-ओझर रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपाचे सुरक्षादर्शक लावले आहेत. परंतु पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या कुठल्याही उपाययोजना अजून केलेल्या नाहीत. ही अपूर्ण कामे गणपती सणाच्या अगोदर करण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.