राजहंसगड ग्रामस्थांचा बैठकीत निर्णय, बेकायदेशीर कृत्य करणाऱयाला 1 लाखाचा दंड : आमदारांकडून शांततेचे आवाहन
प्रतिनिधी /येळ्ळूर
राजहंसगड येथील रेशन दुकान गाव पंच कमिटीला किंवा इतर कोणालाही विश्वासात न घेता एकाने स्वतःच्या नावे करून घेतले. नवीन कमिटी स्थापन करून आपल्याच कुटुंबातील व्यक्तींना सदस्य केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर मंगळवारी रात्री मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर बुधवारी याबाबत गावात बैठक घेऊन पुन्हा हे रेशन दुकान पूर्वीप्रमाणेच गाव पंच कमिटीच्या नेतृत्वाखालीच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या प्रकरणावर पडदा पडला असून, बेकायदेशीर नाव दाखल करणाऱयाला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
राजहंसगड गावामध्ये 10 वर्षापूर्वी ईरय्या बुरलीकट्टी हे दुकान चालवत होते. मात्र त्यांनी वितरणामध्ये गैरप्रकार केल्याने त्यावेळी त्यांच्याकडून ते रेशन दुकान काढून घेण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर ते दुकान गाव पंचकमिटीकडे देण्यात आले. ना नफा ना तोटा यानुसार हे दुकान चालविण्यात आले. दुकानामध्ये जो फायदा होईल तो गावच्या विकासासाठी किंवा इतर कामांसाठी वापरण्यात येत होता.
पंचकमिटी अध्यक्षानेच दुकान नावावर करून घेतले
या गावपंच कमिटीचे अध्यक्ष म्हणून भाऊराव जोतिबा पवार हे होते. 2008 साली कमिटी स्थापन करून हे दुकान सुरू करण्यात आले होते. 2019 पासून मात्र भाऊराव पवार यांनी स्वतःच्या नावेच हे रेशन दुकान करून घेतले. त्यासाठी कमिटी स्थापन केली.
यामध्ये आपल्या घरातीलच सदस्यांना तसेच आपल्या विश्वासातील व्यक्तींना सामावून घेण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
मंगळवारी रात्री संपूर्ण गाव एकत्र आले. यामुळे बराच तणाव निर्माण झाला होता. रात्रीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी समजुत काढली. बुधवारी बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार या संपूर्ण प्रकरणाची माहिती आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना देण्यात आली. त्याही बुधवारी गावामध्ये उपस्थित राहिल्या. त्यांनी शांततेचे आवाहन केले. गावच्या पंच कमिटीच्या मार्गदर्शनानुसारच दुकान सुरू ठेवा, असे सांगितले. यावेळी अन्न आणि नागरि पुरवठा खात्याचे निरीक्षक अब्जल भागोजीकोप हे उपस्थित होते.