ऑनलाइन टीम / पुणे :
स्वराज्यावरील महासंकटाच्या घोर अंधकारातील स्वराज्यनिष्ठ तळपता तारा म्हणजे अजिंक्य सरसेनापती संताजी घोरपडे. श्रीमंत राजेघोरपडे प्रतिष्ठानच्या वतीने अजिंक्य सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या 323 व्या पुण्यतिथीनिमित्त धनकवडी येथे त्यांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक, संकल्पक, संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष शेखर पवार, राजेघोरपडे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रोहित घोरपडे, आधारस्तंभ गिरीश घोरपडे उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन अभिवादन देण्यात आले. यावेळी राजेघोरपडे प्रतिष्ठानने बनवलेल्या संताजींच्या पुतळा अनावरणाच्या आणि पोवाडा अनावरणाच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला.
अमित गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूरायानंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात अतिशय प्रतिकूल परिस्थिती मध्ये शिवरायांच्या गनिमीकावा युध्दनीतिचा व कडव्या सैनिकी शिस्तीचा अवलंब करुन त्यांनी स्वराज्याला स्थैर्य प्राप्त करुन दिले. तंबूचे कळस कापून औरंगजेबाच्या मनसुब्याला उध्द्वस्त करण्याचे मानसिक बळ त्यांनी मराठ्यांमध्ये निर्माण केले. आणि त्यांच्या याच गौरवशली वारश्याचे सार्थ वाहक हे रोहित घोरपडे व गिरीश घोरपडे आहेत, असेही त्यांनी सांगितले.