पाचव्या पिढीतील ‘स्टील्थ बाँबर’ देशातच निर्माण करण्याचा प्रकल्प लवकरच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अत्याधुनिक संरक्षण सामग्रीच्या निर्मितीत ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी भारताने एक महत्वाकांक्षी तंत्रज्ञान विकास योजना हाती घेतली आहे. या योजनेनुसार भारत अत्याधुनिक युद्ध विमाने निर्माण करणार असून ही विमाने रडावर न दिसणारी (स्टील्थ) असतील. या विमानांच्या इंजिनांची निर्मिती देशातच करण्यात येत असून इंजिनांच्या प्रारुपांना (प्रोटोटाईप) अंतिम स्वरुप देण्याचे कार्य होत आहे.
या प्रारुपांची माहिती लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीकडे पाठविण्यात येणार आहे. समितीने संमती दिल्यास या विमानांच्या निर्मितीतील महत्वाचा टप्पा पार होणार आहे. संरक्षण आणि अर्थ विभागांशी चर्चा केल्यानंतर ही माहिती पुढील वर्षांच्या प्रारंभी संरक्षण समितीकडे पाठविण्यात येईल.
जटील तंत्रज्ञान
पाचव्या पिढीतील स्टील्थ बाँबर तयार करण्याचे तंत्रज्ञान जटील असून ते विकसीत करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. हा प्रकल्प बराच खर्चिकही असतो. सध्या जगात केवळ तीनच देश अशी विमाने तयार करतात. अमेरिकेची एफ ए-22 आणि एफ-35, चीनची झेंगडू जे 20 आणि रशियाची सुखोई 57 ही या श्रेणीतील केवळ चारच विमाने सध्या जगात आहेत. तथापि, सुखोई 57 आणि चीनचे जे 20 हे विमान अद्यापही पाचव्या पिढीतील परिपूर्ण विमाने म्हणता येणार नाहीत, असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत भारताने हे यश संपादन केल्यास सामरिक क्षेत्रात भारताचा दबदब वाढणार आहे.
खर्चाचा विषय
स्टील्थ बाँबर किंवा एएमसीए विमान तयार करण्यासाठी प्रत्येकी 15 हजार कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. या विमानांचे प्रथम प्रारुप 2025-2026 पर्यंत निर्माण केले जाऊ शकते. तर या विमानांच्या ‘मार्क 1’ श्रेणीचे उत्पादन 2030-2031 पर्यंत पेले जाऊ शकते, असे तज्ञांनी स्पष्ट पेले आहे.
वायूदलासाठी महत्वपूर्ण
हा प्रकल्प वायुदलासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. पाकिस्तान आणि चीन यांना एकाचवेळी तोंड द्यायची वेळ आली तर भारताकडे युद्ध विमानांच्या किमान 42 स्क्वाड्रन्स असणे आवश्यक आहे. मात्र सध्या 30 ते 32 उपलब्ध आहेत. त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा अशीच वायूदलाची इच्छा आहे.
विलंब टाळण्यासाठी…
वायूदलाला अत्याधुनिक विमाने पुरेशा प्रमाणात आणि लवकरात लवकर हवी असल्याने प्रथम या स्टील्थ विमानांची इंजिने अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक या कंपनीकडूनच घेण्यात येतील. मात्र त्याचवेळी पूर्ण भारतीय बनावटीची अशी इंजिने तयार करण्याच्या कामाचा प्रारंभही या बरोबरच करण्यात येईल. त्यामुळे प्रारंभी विदेशी इंजिनांवर निर्भर रहावे लागणार असले तरी येत्या 10 वर्षांमध्ये इंंजिनासह संपूर्ण भारतीय रचनेचे स्टील्थ युद्ध विमान देशातच निर्माण करणे सहज शक्य होईल, अशी तज्ञांची भूमीका आहे. केंद्र सरकारचा या प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा लवकर यश मिळण्याची शक्यता आहे.