प्रतिनिधी / पणजी :
राज्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाच्या संकटाचा विळखा वाढत चालला असून काल गुरुवारी नव्याने 44 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सांखळी मतदारसंघात पाच रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 658 वर पोचला आहे. गुरुवारी 46 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागात वाढू लागल्याने लोकांमध्ये भीती वाढली आहे. मात्र तरीही राज्यात कोरोना नियंत्रणात असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करीत आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या मांगोरहिलचा आकडा 270 वर पोचला तर मांगोरहिलशी संबंधित कोरोना बाधितांचा आकडा 190 वर पोचला आहे.
सर्वत्र रुग्णांच्या संख्येत वाढ
राज्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कुडतरीत 31, मडगाव 16 तर आंबेलीशी संबंधित रुग्णसंख्या 24 वर पोचली आहे. बेती येथे 1, केपेत 8 तर लोटली येथील रुग्णांची संख्या 11 एवढी आहे. इंदिरानगर चिंबल येथे 4 तर पर्वरी येथे 1 रुग्ण सापडला आहे. म्हापसा, कुंडई व डिचोली येथे प्रत्येकी 1 रुग्णांची नोंद आहे तर कोणकोण येथे 2 रुग्ण सापडल्याची नोंद आहे. चिंबल येथील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 25 वर पोचली आहे तर वास्को भागातील आकडा गतीने वाढत आहे. सडा येथील रुग्णसंख्या 58 वर पोचली आहे. बायणा येथे 39 तर न्युवाडे येथील एकूण रुग्णसंख्या 19 एवढी आहे. मोर्ले सत्तरीतील रुग्णसंख्या 21 झाली आहे.
वास्कोतील मांगोरहिलनंतर आता झुआरीनगरातील दाट लोकवस्तीतही कोरोनाने प्रवेश केला. गुरुवारी या भागातही कोरोना बाधीत सापडल्याने झुआरीनगराबरोबरच आसपासच्या भागात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मांगोरहिलसारखीच दाट लोकवस्ती असलेल्या झुआरीनगरात कोरोना बाधित आढळला नव्हता. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीतपणे चालले होते. परंतु या भागात कोरानाचे रूग्ण सापडल्याची बातमी पसरल्याने खळबळ निर्माण झाली.
याशिवाय सत्तरी तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. धारबांदोडा, काणकोण या तालुक्यांमध्येही गुरुवारी रुग्ण सापडले आहेत.
सांखळीत सापडले 5 रुग्ण : आजपासून बाजार बंद
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 एवढी झाली आहे. याअगोदर माजी आरोग्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता आणखी चार रुग्ण सापडले आहेत. मात्र आकडा वाढू लागल्याने सांखळी व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांखळी ही बाजारपेठ असल्याने हरवळे, विर्डी, गावठण, कुडणे, न्हावेली, आमोणा, सुर्ल व सांखळीतील लोकांची वर्दळ या भागात असते. त्यामुळे या सर्व भागात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र कोरोनाचा आकडा वाढत असला तरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्यात कोरोना नियंत्रणात असल्याचा दावा करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे काँग्रेसनेही मुख्यमंत्री व सरकारवर जोरदार टीका चालविली आहे.