ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात अनलॉकमध्ये हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, तर काही प्रमाणात लोकलसेवा देखील सुरू करण्यात आली आहेत, मात्र, राज्यातील मंदिरे अद्याप बंदच आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची अध्यात्मिक आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत मंदिरे सुरु करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत जैन, बौद्ध, शिख, महानुभाव, इस्कॉन, सन्यासी आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ते म्हणाले, राज्यात अन्य सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र, मंदिरे मागील सात महिन्यांपासून बंदच आहेत. आता ठाकरे सरकारने 1 नोव्हेंबर पर्यंत मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा मंदिरांची टाळी तोडू, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, भाजपनेही यापूर्वी राज्यभरात आंदोलने केली होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय अजूनही कायम ठेवला आहे.